Join us  

२१ टक्के शाळकरी विद्यार्थ्यांना स्थूलत्वाची समस्या, डॉक्टरांचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 2:49 AM

तपासणीअंती ४ हजार ८०६ मुलांमधील १ हजार २८ मुलांचे वजन जास्त असून, ८१७ मुले ही लठ्ठपणाचे शिकार ठरल्याचे दिसून आले.

मुंबई : शहर, उपनगरातील १५ शाळांमध्ये करण्यात आलेल्या तपासणीअंती २१ टक्के शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्थूलत्वाची समस्या दिसून आली. ११ ते १५ या वयोगटांतील सुमारे ९ हजार शालेय विद्यार्थ्यांची शरीर संरचना, बॉडी मास इंडेक्स (बीएमआय), आजार आणि आहार यावर आधारित ही तपासणी करण्यात आली.तपासणीअंती ४ हजार ८०६ मुलांमधील १ हजार २८ मुलांचे वजन जास्त असून, ८१७ मुले ही लठ्ठपणाचे शिकार ठरल्याचे दिसून आले. तर ४ हजार १९४ मुलींमधील ८०५ मुलींचे वजन जास्त असून, त्यातील ६१२ मुली लठ्ठपणाने त्रस्त असल्याचे समोर आले. याचाच अर्थ, सुमारे २१ टक्के शाळकरी विद्यार्थ्यांना स्थूलत्वाची समस्या सतावत असल्याचे समोर आले.जी मुले दोन तासांपेक्षा जास्त लॅपटॉप, टीव्ही, मोबाइलचा वापर करतात, अशा मुलांची संख्या ५,३३७ (५९.३ टक्के) इतकी आहे. दोन तासांपेक्षा कमी मोबाइलचा वापर करणाऱ्या मुलांची संख्या ३,६६३ (४०.७ टक्के) इतकी आहे. या मुलांमध्ये आळस, श्वास घेण्यास अडचणी, अंगावरील चट्टे अशा प्रकारची लठ्ठपणाची लक्षणे दिसून आली.बदलती जीवनशैली, जंक फूडचे सेवन, तसेच व्यायामाचा अभाव, यामुळे वजन वाढते, लठ्ठपणा येतो. वाढत्या वजनामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, हाइपरलिपीडेमिया, इन्सुलिनप्रतिरोध यासारख्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे पालकांनी, तसेच शिक्षकांनी याकडे वेळीच लक्ष देऊन महत्त्वाची भूमिका बजाविणे आणि मुलांची विशेष खबरदार घेणे गरजेचे आहे, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.लहानपणी लठ्ठपणाचे शिकार ठरलेल्या मुलांवर शारीरिक, सामाजिक आणि भावनिकदृष्ट्या विविध परिणाम होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अभ्यासावरही परिणाम होतो. लठ्ठपणा आता सायलेंट किलरच्या स्वरूपात दिसून येत आहे आणि त्याबाबत जनजागृतीसाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. लठ्ठपणासारख्या समस्येवर मात करण्यासाठी संतुलित आहार आणि व्यायामाची जोड असणे आवश्यक आहे. जीवनशैलीत अचूक बदल केल्याने लठ्ठपणासारख्या आजारांपासून दूर राहता येणे शक्य आहे.- डॉ. मनीष मोटवानी.

टॅग्स :आरोग्य