Join us

चार तासांत वाचले साडेचार कोटी; सायबर हेल्पलाइनमुळे दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 06:37 IST

सिम स्वॅपद्वारे फसवणूक

मुंबई : सायबर हेल्पलाइनमुळे चार तासांत साडे चार कोटी वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे. कांदिवलीतील खाजगी कंपनीच्या मालकाने सिम स्वॅप सायबर फसवणुकीत हे पैसे गमावले होते. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ डिसेंबरला सायबर ठगांनी कांदिवलीतील एका खाजगी कंपनीच्या मालकाचे सिम स्वॅप करून त्यांच्या कंपनीच्या नावावर असलेल्या बँक खात्यामध्ये अनधिकृतरीत्या प्रवेश मिळवला. त्यानंतर, सायबर ठगांनी या खात्यातून व्यवहार करीत सात कोटी ५० लाख रुपये विविध बँक खात्यांवर वळविले. कंपनी मालकाला ई-मेलवर याची माहिती दिसताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी लगेचच १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून नोंदविली.

त्यानुसार, १९३० सायबर हेल्पलाइन कक्षाचे पोलिस उपनिरीक्षक मंगेश भोर, पोलिस हवालदार राऊळ, महिला पोलिस हवालदार वालावलकर, पोलिस शिपाई किरण पाटील यांनी तत्काळ संबंधित बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांना व्यवहार थांबविण्यास सांगितले. त्यामुळे साडे सात कोटीपैकी ४ कोटी ६५ लाख वाचविण्यात यश आले.

अशी टाळा फसवणूक

आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी बँक खाते एसएमएसशिवाय ई-मेल अलर्ट कार्यान्वित करावे. सिम कार्ड बंद झाल्यास संबंधित बँकेला त्याचा खात्याशी असलेला संबंध तोडण्यास कळवावे.

विशेषतः सार्वजनिक सुटीच्या 3 दिवशी किंवा सलग सुट्यांच्यावेळी या घटना घडतात. त्यामुळे मोबाईल गॅलरी आणि बँकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन संपर्क करण्यात अडथळा येतो.

अशा वेळी कस्टमर केअरशी 3 संपर्क साधून वेगाने पावले उचलण्याची गरज आहे. टू-फॅक्टर ऑथिटिकेशन (दुहेरी पडताळणी) कार्यान्वित करा. हे आपल्या सोशल मीडिया खात्यांमध्ये अनोळखी व्यक्तींना अनधिकृत प्रवेश रोखण्यास मदत करू शकते. 

टॅग्स :मुंबई पोलीससायबर क्राइम