माझगावमधील ३६ कुटुंबे वाऱ्यावर
By Admin | Updated: September 27, 2016 02:47 IST2016-09-27T02:47:50+5:302016-09-27T02:47:50+5:30
माझगावच्या घोडपदेव क्रॉस रोडवर असलेल्या मालिम हाउस या चाळीमधील ३६ कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. कारण गेल्या दोन वर्षांपासून चाळीचा पुनर्विकास

माझगावमधील ३६ कुटुंबे वाऱ्यावर
मुंबई : माझगावच्या घोडपदेव क्रॉस रोडवर असलेल्या मालिम हाउस या चाळीमधील ३६ कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. कारण गेल्या दोन वर्षांपासून चाळीचा पुनर्विकास आणि चाळकऱ्यांचे भाडे रखडल्याचे चाळकऱ्यांचे म्हणणे आहे.
येथील रहिवासी आणि सोसायटीचे सचिव भिकाजी पांडुरंग साळुंखे यांनी सांगितले की, चाळीचे मालक आणि विकासक मुस्तानशीर मर्चंट यांना २०१० साली रहिवाशांनी चाळीचा पूर्ण ताबा दिला होता. गॅलेक्सी गृहनिर्माण सहकारी संस्थेची निर्मिती करून रहिवाशांनी विकासकासोबत करार केला. २४ महिन्यांत ३५० चौरस फुटांच्या सदनिका बांधून देण्याचे करारात मर्चंट यांनी मान्य केले होते.
दरम्यानच्या काळात दरमहा स्थलांतरित रहिवाशांना भाडे देण्याचे विकासकाने करारात कबूल केले होते. ठरल्याप्रमाणे प्रकल्पाला सुरुवात झाली आणि चार मजल्यांची इमारत उभी राहिली. मात्र त्यानंतर २०१३ सालापासून इमारतीचे बांधकाम थांबवण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून विकासकाने रहिवाशांना भाडे देणेही थांबवले आहे. परिणामी, मालकीचे घर तयार झालेले नसताना, भाड्याचे घर खाली केल्याने रहिवाशांना रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे.
यासंदर्भात म्हाडाकडे तक्रार केल्यानंतर प्रशासनाने विकासक आणि रहिवासी संस्थेची सुनावणी घेतली. पुनर्विकासासाठी निधीची कमतरता असल्याचे कारण देत विकासकाने मुदतवाढ मागितली. मात्र रहिवाशांच्या बाजूने निर्णय देत म्हाडा प्रशासनाने विकासकाला तत्काळ भाडे देण्याचे आदेश दिले. विकासकानेही ३१ आॅगस्ट २०१६पर्यंत थकीत भाडे देण्याचे लेखी मान्य केले. मात्र या मुदतीनंतर एक महिना संपायला आला आहे. तरीही विकासक रहिवाशांना कोणत्याही प्रकारची मदत करत नसल्याचे साळुंखे यांचे म्हणणे आहे.
आमचीही फसवणूक झाली आहे!
धक्कादायक बाब म्हणजे रहिवाशांसोबत विकासकाने अधिकच्या सदनिकांवरही बुकिंग केलेले आहे. काही सदनिकांचे संपूर्ण पैसे घेतल्याचेही बुकिंग करणाऱ्या रहिवाशांचे म्हणणे आहे. मात्र आत्ता आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली आहे, अशी प्रतिक्रिया काही बुकिंग केलेल्या रहिवाशांनी दिली. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करण्यास गेलो असता, न्यायालयात जाण्याचा सल्ला पोलीस देत असल्याचेही काहींनी सांगितले. त्यामुळे तूर्तास तरी सर्व रहिवासी दर आठवड्याला इमारतीच्या बांधकामस्थळी एकत्र येऊन मोर्चेबांधणी करीत आहेत.
विकासक नॉट रिचेबल
यासंदर्भात मर्चंट यांना ‘लोकमत’ने सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. म्हाडाच्या निर्णयासंदर्भात विचारणा करण्यासाठी सोसायटीनेही विकासकाला संपर्क साधला होता. मात्र विकासक नॉट रिचेबल असल्याचे सोसायटीने ‘लोकमत’ला सांगितले.