Join us  

'महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जाणार नाहीत, राज्यात 30 हजार कोटींची गुंतवणूक'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2021 3:36 PM

राज्यात सातत्याने गुंतवणूक वाढत असल्याचे सांगून देसाई म्हणाले की, वर्ल्ड एक्स्पो, दुबई या आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेत झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

ठळक मुद्देशिवसेना नेते सुभाष देसाई यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून नाव न घेता भाजपवर एकप्रकारे निशाणाच साधला आहे.  

मुंबई - देशातील उद्योजकांची पहिली पसंती ही महाराष्ट्र राज्याला आहे. राज्यात असलेल्या उद्योगस्नेही वातावरणामुळे अनेक गुंतवणुकदार पुढे येत आहेत. देशातील सर्वाधिक परदेशी गुंतवणुक ही आपल्या राज्यात होते. त्यामुळे राज्यातील उद्योग बाहेर जाणार नाहीत, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात सातत्याने गुंतवणूक वाढत असल्याचे सांगून देसाई म्हणाले की, वर्ल्ड एक्स्पो, दुबई या आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेत झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या परिषदेत 25 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली असून 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात होणार आहे, या माध्यमातून 30 हजारापेक्षा अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले. विशेष म्हणजे ममता बॅनर्जींच्यामुंबई दौऱ्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबईतील उद्योग पश्चिम बंगालला पळवून नेण्यात येत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला होता. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून नाव न घेता भाजपवर एकप्रकारे निशाणाच साधला आहे.  

व्यापार केंद्र मुंबईतच होणार

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. देशात येणाऱ्या बहुतांश गुंतवणूकदारांची पसंती ही मुंबईला आहे. इथे दोन शेअर बाजाराच्या माध्यमातून आर्थिक उलाढाल होत असते. या पार्श्वभूमीवर जागतिक व्यापार केंद्र म्हणून मुंबई ही योग्य आहे हे कोणीही आर्थिक तज्ज्ञ सांगेल. गुजरात येथे केंद्र शासनाच्या मान्यतेने केंद्र सुरु झालेले असले, तरी लवकरच शासन मुंबई येथे व्यापार केंद्र उभारेल, असेही देसाई यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :सुभाष देसाईमुंबईआशीष शेलारममता बॅनर्जीव्यवसाय