‘आय कॉल’वर दिवसाला १८ हजार कॉल

By Admin | Updated: May 24, 2016 06:03 IST2016-05-24T06:03:06+5:302016-05-24T06:03:06+5:30

दहावी-बारावीचा निकाल काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. निकालाचा ताण विद्यार्थ्यांबरोबरच पालकांवरही असून हा ताण कमी करण्यासाठी विद्यार्थी ‘आय-कॉल’सारख्या हेल्पलाइनची मदत घेत

18 thousand calls a day to 'I call' | ‘आय कॉल’वर दिवसाला १८ हजार कॉल

‘आय कॉल’वर दिवसाला १८ हजार कॉल

मुंबई : दहावी-बारावीचा निकाल काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. निकालाचा ताण विद्यार्थ्यांबरोबरच पालकांवरही असून हा ताण कमी करण्यासाठी विद्यार्थी ‘आय-कॉल’सारख्या हेल्पलाइनची मदत घेत आहेत. सध्या दिवसाला किमान १८ हजारांहून अधिक विद्यार्थी ‘आय-कॉल’च्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधत आहेत. कॉलबरोबरच मेलमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. साधारण ६५० मेल आय-कॉलच्या मेल आयडीवर येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून निकालाच्या विचारापासून टेन्शन फ्री करण्याचे काम आय-कॉलचे समुपदेशक करत आहेत, असे आय-कॉल समन्वयक पारस शर्मा यांनी सांगितले.
निकालाचा ताण कमी करण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सच्या ‘आय- कॉल’ या हेल्पलाइनवर कॉल्स करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यात दहावीतील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.
कोणत्या शाखेची निवड करायची? कोणते महाविद्यालय निवडायचे? निकाल वाईट लागला तर पुढे काय करायचे, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडत आहेत. या विद्यार्थ्यांचा ताण हलके करण्याचे काम आय-कॉलद्वारे केले जात आहे. आहे तो निकाल स्वीकारून पुढे काय करता येईल, शिवाय साचेबद्ध करिअरशिवाय अन्य कोणत्या पर्यायांची निवड करता येईल याविषयी विद्यार्थ्यांना मागदर्शन केले जात आहे. (प्रतिनिधी)

हेल्पलाइन क्रमांक - २५५६३२९१
ई-मेल आयडी - toicall@tiss.edu
ही हेल्पलाइन सोमवार ते शनिवार स. १० ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू असते.

Web Title: 18 thousand calls a day to 'I call'