मुंबई : मुंबईतही हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ वाढत असून, गेल्या चार महिन्यांत मुंबई पोलिसांच्या दप्तरी १६३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यापैकी १३० गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. दिवसाला एक ते दोन महिला हुंड्यासह कौटुंबिक हिंसाचाराच्या शिकार ठरत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हुंड्यासाठी छळ करणाऱ्यांमध्ये उच्चशिक्षितांचे प्रमाण अधिक आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या चार महिन्यांत मुंबईत महिलांसंबंधित २ हजार ४०९ गुन्हे नोंद झाले. त्यापैकी २०७४ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. यामध्ये ३८१ जणी विकृत वासनेच्या शिकार ठरल्या. तर, ४८९ जणींच्या अपहरणाची नोंद झाली. हुंड्यासाठीही महिलांच्या मानसिक, शारीरिक छळ सुरू असून गेल्या चार महिन्यांत १६३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हुंड्याव्यतिरिक्त होत असलेल्या छळाप्रकरणी १६५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हुंड्यासाठी एकीचा बळी घेण्यात आला आहे तर, पाच जणींनी आयुष्य संपविले.
हुंड्याच्या छळाला कंटाळून पाच जणींनी आत्महत्या करत टोकाचे पाऊल उचलले आहे. यामध्ये सासरच्या मंडळीवर गुन्हे नोंदवत कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांकडून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न
कुटुंबातील वाद पोलिसांपर्यंत आल्यानंतर थेट कायदेशीर कारवाई करण्याऐवजी महिला अधिकारी व कर्मचारी सुरुवातीला त्यांचे पूर्ण म्हणणे ऐकून घेऊन पुढील कार्यवाही करतात. महिला कक्षाकडून अनेक प्रकरणांत समेट घडवून संसार जोडण्याचे काम या माध्यमातून करण्यात येत आहे.
बदनामीची भीती अन् हुंड्याला खतपाणी
अनेक जण बदनामीच्या भीतीने मुलीला मानसिक शारीरिक छळ सुरू असतानाही सांभाळून घेण्यास सांगून सासरच्या मागण्या पूर्ण करतात. यातून मुली टोकाचे पाऊल उचलत असल्याचे काही प्रकरणांत दिसून आले.