मुंबई : पिसे येथील बांधावरील एका रबरी ब्लॅडरमध्ये शनिवारी अचानक बिघाड झाल्याने पाणीगळती सुरू झाली. या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने मंगळवारी संपूर्ण मुंबईत १५ टक्के पाणीकपात केली जाणार आहे.
पिसे येथील बांधावरील गेटच्या ३२ पैकी एका रबरी ब्लॅडरमध्ये शनिवारी अचानक बिघाड झाल्याने पाणी गळती सुरू झाली. त्याची दुरुस्ती करण्यासाठी पिसे येथील पाण्याची पातळी ३१ मीटरपर्यंत खाली आणण्यासाठी पालिकेच्या जल अभियंता विभागाला भातसा धरणातून येणारा पुरवठा नियंत्रित करावा लागला. त्यानंतर पालिकेकडून रबरी ब्लॅडर दुरुस्तीचे काम हाती घेऊन पूर्ण करण्यात आले. या काळात भातसा धरणातून पुन्हा पाणी सोडण्यात आले असले तरी बंधाऱ्याची पाणी पातळी पूर्ववत होण्यासाठी वेळ लागणार आहे.
दरम्यान, पाणी कपाती दरम्यान मुंबईकरांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
अचानक बिघाड झाल्याने पाणीगळती -
१) अचानक बिघाड झाला. पाणी गळती झाली. पाणीपातळी ३१ मीटरपर्यंत आल्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.
२) सोमवारी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत यांत्रिक झडपा दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले.
३) पालिकेच्या पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये प्रक्रिया करून येवई येथील महासंतुलन जलाशयामार्फत मुंबईकरांना हा पाणीपुरवठा केला जातो.