अजूनही १ लाख २७ हजार जागा रिक्त; ११ वी ऑनलाईन प्रवेशाची चौथी विशेष फेरी मुदत संपली
By स्नेहा मोरे | Updated: August 31, 2023 20:38 IST2023-08-31T20:36:48+5:302023-08-31T20:38:24+5:30
पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या ८ हजार ४५० विद्यार्थ्यांपैकी ७ हजार ३१५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

अजूनही १ लाख २७ हजार जागा रिक्त; ११ वी ऑनलाईन प्रवेशाची चौथी विशेष फेरी मुदत संपली
मुंबई - अकरावी ऑनलाइन प्रवेश चौथी विशेष फेरी नुकतीच पार पडली. या फेरीच्या गुणवत्ता यादीत ११ हजार १२० विद्यार्थ्यांना महाविद्यालय ॲलॉट करण्यात आले होते. त्यातील गुरुवार सायंकाळपर्यंत ८ हजार ९५० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. चौथ्या विशेष फेरीची प्रवेश निश्चितीची मुदत गुरुवारी सायंकाळी संपली, आता पुरवणी परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी फेरी सुरु होणार आहे. मुंबई विभागातील २ लाख ८६ हजार ६२९ विद्यार्थ्यांपैकी २ लाख ५९ हजार ४८७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. अजूनही २७ हजार १४२ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत.
वाणिज्य शाखेत सर्वाधिक विद्यार्थी
कला, वाणिज्य, विज्ञान आणि एचसीव्हीसी या पर्यांयापैकी वाणिज्य शाखेत सर्वाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, हे प्रमाण १ लाख ३७ हजार २७८ इतके आहे. त्याखालोखाल, विज्ञान शाखेत ९३ हजार ८८६, कला शाखेत २५ हजार ८०२ आणि एचसीव्हीसी शाखेत २ हजार ५२१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
कोटा निहाय प्रवेश
कॅप २०५०१२
इनहाऊस ९३९०
अल्पसंख्यांक ३५७५९
व्यवस्थापन ९३२६
एकूण २५९४८७
पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या ८ हजार ४५० विद्यार्थ्यांपैकी ७ हजार ३१५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्याखालोखाल, दुसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या १ हजार ७४ विद्यार्थ्यांपैकी ७५३, तर तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या ५६६ पैकी ३४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.