११४ शाळांची होणार दुरुस्ती
By Admin | Updated: May 29, 2014 01:09 IST2014-05-29T01:09:51+5:302014-05-29T01:09:51+5:30
ठाणे महापालिका शाळांची दुर्दशा अत्यंत बिकट झाली असून ३२ शाळांमधील मलनि:स्सारण वाहिन्या नादुरुस्त आहेत.

११४ शाळांची होणार दुरुस्ती
नामदेव पाषाणकर, घोडबंदर - ठाणे महापालिका शाळांची दुर्दशा अत्यंत बिकट झाली असून ३२ शाळांमधील मलनि:स्सारण वाहिन्या नादुरुस्त आहेत. १० शाळांमध्ये पाणी नाही, १२ शाळा गळक्या आहेत, तर १७ शाळांच्या विजेच्या तक्रारी आहेत. पारशीवाडी, खिडकाळी, ज्ञानसाधना शाळेमधील वीज मीटर बंद असल्याच्या तक्रारी मुख्याध्यापकांनी शिक्षण मंडळाकडे केल्या आहेत. शाळांची ही परिस्थिती लक्षात घेऊन आयुक्त असिम गुप्ता यांनी सर्व शाळांमधील गैरसोय दूर करण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षण मंडळाने आठ गटांमधील शाळांचा अहवाल मुख्याध्यापकांकडून घेतला आहे. त्यानुसार ११४ शाळांच्या ८७३ वर्गखोल्यांचा अहवाल मंडळाकडे प्राप्त झाला आहे. यामध्ये वर्गखोल्यांची दुरुस्ती, विद्युत, पाणी, शौचालय यासंदर्भातील तक्रारी मांडण्यात आल्या आहेत. सर्व शाळांच्या तक्रारी एकत्रित सोडवण्यासाठी हा अहवाल आयुक्तांनी मागितला असून अंदाजे ६० ते ७० लाख खर्च करून शाळांची दुरुस्ती होणार आहे. कोकणीपाडा, डायघर, मोठी देसाई, खर्डीपाडा, सावरकरनगर, आनंदनगर, सावे, बेतवडे आदी शाळांमध्ये पाण्याची सुविधा नसल्याचे म्हटले आहे. शाळा क्रमांक ७१ कळवा येथील दोन वर्गाला व किसननगरच्या शाळेत वाळवी लागली आहे. चेंदणी, आतकोनेश्वर, कळवा, किसननगर, भार्इंदरपाडा, वसंतविहार, सावरकरनगर, इंदिरानगर या शाळा गळक्या आहेत, तर कोकणीपाड्याच्या शाळेत जमिनीतून पाणी येत असल्याची तक्रार आहे. मुंब्य्राच्या ११८ नंबरच्या शाळेत वीजकपातीमुळे अंधाराचे साम्राज्य आहे. टकारडापाडाच्या शाळेत शौचालयाची सोय नाही. आझादनगर, खिडकाळी शाळेत पाण्याची टाकी नाही. ३२ शाळांमधील मलनि:स्सारण व्यवस्था नादुरुस्त झालेली असल्याने ती दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. काही मुख्याध्यापकांनी वस्तुनिष्ठ अहवाल दिला नसल्याची बाब नगरसेवक हिरालाल पाटील यांनी उघड केली असून, फडकेपाड्याची शाळा गळत असताना तसा अहवाल दिलेला नाही. तसेच गायमुखच्या शाळेत पिण्याची टाकी नाही तरी रिपोर्टदेखील दिलेला नाही. (वार्ताहर)