Join us  

देशासाठी बलिदान देणाऱ्या 114 स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक 'अद्यापही  प्रतीक्षेत'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 8:53 AM

मासेमारीत देशात वेसावे कोळीवाड्याचा दुसरा क्रमांक लागतो. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकापासून 7 किमी अंतरावर असलेल्या वेसावे कोळीवाड्याला खूप महत्व आहे. कारण, 150 वर्षे देशावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांच्या विरोधात देशवासियांनी

मनोहर कुंभेजकर

मुंबई - मासेमारीत देशात वेसावे कोळीवाड्याचा दुसरा क्रमांक लागतो. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकापासून 7 किमी अंतरावर असलेल्या वेसावे कोळीवाड्याला खूप महत्व आहे. कारण, 150 वर्षे देशावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांच्या विरोधात देशवासियांनी दिलेल्या स्वातंत्र्य लढ्यात वेसावे कोळीवाड्यातील 114 स्वातंत्र्य सैनिकांनी हिरीरीने भाग घेतला होता. मात्र, 72 वा स्वातंत्र्यदिन आज देशात थाटात साजरा होत असताना येथील 114 स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक उभारले गेले नसल्यची खंत वेसावकरांची आहे.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अंधेरी(प)पासून 7 किमी अंतरावर असलेल्या वेसावे कोळीवाड्याला ऐतिहासिक महत्व आहे. येथील सुमारे 114 स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढा देऊन तुरुंगवास देखील भोगला. त्यामध्ये येथील कोळी महिलांनीही सहभाग घेतला होता. भारताचे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची येथील समुद्रकिनारी 11 नोव्हेंबर 1945 साली विराट जाहीर सभा झाली होती. त्यावेळी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू असतील अशी घोषणा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी केली होती, अशी माहिती कोळी समाजाचे गाढे अभ्यासक भगवान भानजी यांनी लोकमतशी बोलताना दिली.

येथील स्वातंत्र्य सैनिक दिवंगत पोशां नाखवा यांना तर ब्रिटीशांनी "टायगर ऑफ वर्सोवा"अशी उपाधी दिली होती. त्यांच्या नावाने यारी रोड येथे पालिकेची शाळाही आहे. वेसाव गावातील अॅड.शांताराम वेसावकर, हिराजी मोतिराम चिखले, गोपीनाथ कास्कर, मंजुळाबाई नामदेव वेसावकर, भालचंद्र तेरेकर, हिराबाई घुस्ते, हरिश्चंद्र घुस्ते, मोतीराम शेंडे यांच्यासह एकूण 114 स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात नेत्रदीपक कामगिरी केली होती. आज एकही स्वातंत्र्य सैनिक हयात नाहीत. मात्र, आजही 72 व्या स्वातंत्र्यदिनी येथील 114  स्वातंत्र्य सैनिकांचे साधे स्मारक वेसावे गावात नाही, अशी खंत कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके व प्रवीण भावे यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली. आजच्या तरुण पिढीला आणि मुंबईकरांना त्यांची महती समजावी यासाठी येथील स्वातंत्र्य सैनिकांचे भव्य स्मारक येथील सुमुद्रकिनारी असलेल्या वेसावे स्मशानभूमीच्या 4500 चौफूट मोकळ्या जागेवर झाले पाहिजे, अशी मागणी येथील माजी नगरसेवक मोतीराम भावे यांनी केली होती, अशी माहिती त्यांचे चिरंजीव पंकज भावे यांनी दिली. येथील स्वातंत्र्य सैनिकांचे भव्य स्मारक येथील सुमुद्रकिनारी असलेल्या वेसावे स्मशानभूमीच्या 4500 चौफूट मोकळ्या जागेवर झाले पाहिजे. 1978 ते 1992 पर्यंत नगरसेवक असलेले जेष्ठ मच्छीमार नेते मोतीराम भावे यांच्या प्रयत्नाने वेसावकरांना समुद्रकिनारी स्मशानभूमी मिळाली. सध्या 4500 चौमीटर जागेवर सदर स्मशानभूमी ऊभी असून उर्वरित 4500 चौमीटर जागेवर पालिकेच्या दुर्लक्षामुळे अतिक्रमण झाले आहे. या जागेत स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक झाले पाहिजे ही वेसावकरांची जुनी मागणी असल्याची माहिती त्यांनी दिली. 

वेसावे गावातील स्वातंत्र्य सैनिक विष्णू राघो कोळी (टेलर) यांचे गेल्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. वेसाव्यातील 114 स्वातंत्र्य सैनिकांपैकी शेवटचा बुरुज ढासळला. येथील भाजपा आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते फेब्रुवारी 2017 साली त्यांचा वर्सोवा भूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता अशी माहिती पंकज भावे यांनी दिली. याप्रकरणी वर्सोवा विधानसभा मतदार संघाच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वेसावे कोळीवाडा येथील 114 स्वातंत्र्य सैनिकांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी शासनाने नवीन विकास आराखड्यात कलेक्टर लँडची जागा आरक्षित करावी, अशी आग्रही मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांच्यामुळेच मुंबईतील 40 कोळीवाड्याचे सीमांकन होत आहे. कोळीवाड्यांसाठी नवीन विकास आराखडा तयार करण्यात येईल आणि कोळीवाड्याचे सीमांकन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम आपण आयोजित केलेल्या जानेवारी 2018 च्या वर्सोवा महोत्सवात केली होती. मुंबईतील कोळीवाड्यांच्या होणाऱ्या सीमांकनामध्ये वेसावे कोळीवाडा येथील स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकासाठी जागा आरक्षित करण्यात यावी, अशी आग्रही मागणी केल्याचे आमदार डॉ. लव्हेकर यांनीही सांगितले.

टॅग्स :स्वातंत्र्य दिनभारतशहीदमुंबई