११ महिन्यांत २,९८६ जणांनी गमावले प्राण
By Admin | Updated: November 30, 2015 02:34 IST2015-11-30T02:34:11+5:302015-11-30T02:34:11+5:30
गर्दीमुळे लोकलमधून पडून डोंबिवलीच्या भावेश नकातेचा मृत्यू झाला आणि रेल्वे अपघातांची पुन्हा एकदा चर्चा झाली. गेल्या ११ महिन्यांत मुंबई शहर व उपनगरात रेल्वेच्या विविध

११ महिन्यांत २,९८६ जणांनी गमावले प्राण
मुंबई : गर्दीमुळे लोकलमधून पडून डोंबिवलीच्या भावेश नकातेचा मृत्यू झाला आणि रेल्वे अपघातांची पुन्हा एकदा चर्चा झाली. गेल्या ११ महिन्यांत मुंबई शहर व उपनगरात रेल्वेच्या विविध अपघातांत २ हजार ९८६ जणांना प्राण गमवावे लागले असल्याचे समोर आले आहे. अपघातांमध्ये कल्याण, ठाणे, बोरीवली आघाडीवर आहे.
मुंबई शहर व उपनगरात मोठ्या प्रमाणात रेल्वेचे अपघात होतात. ट्रेनमधून पडून, रूळ ओलांडताना, ओव्हरहेड वायरचा शॉक लागून अशा विविध अपघातांत प्रवाशांना प्राण गमवावा लागतो. तर काही प्रवासी जखमी होतात.
यात सर्वाधिक अपघात हे रूळ ओलांडताना आणि ट्रेनमधून पडून होत असल्याचे रेल्वे पोलीस सांगतात. या वर्षातील नोव्हेंबर महिन्यापर्यंत झालेल्या विविध रेल्वे अपघातांंत २ हजार ९८६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यात २ हजार ६४२ पुरुष तर ३४0 महिला प्रवाशांचा समावेश आहे.
मृतांपैकी २ हजार ४५ जणांचे वारस मिळाल्याची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे २ हजार ९१६ प्रवासी जखमी झाले असून त्यात २ हजार ३८२ पुरुषांचा व ५२९ महिलांचा समावेश आहे. कल्याण रेल्वे पोलीस विभागात सर्वाधिक ४३७ अपघात झाले आहेत. त्यानंतर कुर्ला विभागात ३९0, ठाणे विभागात ३६५ आणि बोरीवली रेल्वे पोलीस विभागांतर्गत ३0२ अपघातांची नोंद झाली
आहे. (प्रतिनिधी) अन्य विभागांतील अपघातांची नोंद
डोंविबली रेल्वे पोलीस विभाग-१८१
वाशी रेल्वे पोलीस विभाग-१९७
वडाळा रेल्वे पोलीस विभाग-१८९
दादर रेल्वे पोलीस विभाग-१५४
सीएसटी रेल्वे पोलीस विभाग-१४६
वसई रेल्वे पोलीस विभाग-२७१