११ मिनिटे आणि ७ स्फोट
By Admin | Updated: July 8, 2015 01:01 IST2015-07-08T00:31:45+5:302015-07-08T01:01:17+5:30
११ जूलै २००६ चा दिवस. सकाळची लोकल पकडून नेहमीप्रमाणे आपल्या कामांसाठी गेलेला मुंबईकर, नित्यनियमाने सर्व कामे उरकून संध्याकाळी पुन्हा घराच्या दिशेने जाण्यासाठी पकडलेली लोकल,

११ मिनिटे आणि ७ स्फोट
मुंबई : ११ जूलै २००६ चा दिवस. सकाळची लोकल पकडून नेहमीप्रमाणे आपल्या कामांसाठी गेलेला मुंबईकर, नित्यनियमाने सर्व कामे उरकून संध्याकाळी पुन्हा घराच्या दिशेने जाण्यासाठी पकडलेली लोकल, खचाखच भरलेल्या लोकलच्या डब्यात आपल्या मित्र आणि नातेवाइकांसोबत गप्पांमध्ये रंगलेला चाकरमानी आणि त्यातच अवघ्या अकरा मिनिटांत झालेले सलग सात बॉम्बस्फोट. पश्चिम रेल्वे मार्गावरील ‘ती’ अकरा मिनिटे आणि सात बॉम्बस्फोट आठवले की लाखो मुंबईकरांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. या स्फोटाने जीवनवाहिनी लोकलही ठप्प झाली होती.
भारताची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या मुंबईने अनेक दहशतवादी हल्ले सहन केले. हे हल्ले होऊनही मुंबईकर पुन्हा नव्याने उभे राहिले. १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले होते आणि हा मुंबईवरील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. त्यानंतरही मुंबईकर सावरले. मात्र तेरा वर्षांनंतर पुन्हा एकदा मुंबईकरांना पश्चिम रेल्वे मार्गावरील साखळी बॉम्बस्फोटाचा हादरा बसला आणि यातून सावरताना बराच काळ गेला. संध्याकाळी ६.२४ ते ६.३५ या अवघ्या अकरा मिनिटांच्या कालावधीत तब्बल सात ठिकाणी सात बॉम्बस्फोट झाले. हे सर्व बॉम्बस्फोट लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात झाले. या स्फोटात तब्बल २0९ जणांचे बळी गेले आणि ७१४ जण जखमी झाले. विखुरलेले शरीराचे तुकडे, जागोजागी मृतदेह आणि जखमी प्रवासी, जखमी प्रवाशांच्या मदतीसाठी सरसावलेले अन्य प्रवासी तसेच परिसरातील नागरिक असेच काहीसे दृश्य त्या वेळी होते.
कुटुंबाची अखेरपर्यंत साथ!
पराग याचा अपघात झाल्यावर उपचारासाठी त्याला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या दिवसापासून पराग कधीच एकटा नव्हता. प्रत्येक वेळी कुटुंबातील एक व्यक्ती परागबरोबर रुग्णालयात असायची. परागच्या शेवटच्या क्षणी परागची आई त्याच्याबरोबरच होती. परागचा अपघात झाला, तेव्हा त्याची पत्नी गर्भवती होती. तिला सातवा महिना चालू होता. परागला मुलगी झाली.
सावंत कुटुंबीयांनी ही आनंदाची गोष्ट परागला सांगितली. पण, शेवटपर्यंत परागला तो आनंद मिळूच शकला नाही. परागची मुलगी त्याला भेटायला आल्यावर त्याला सर्वच जण आवर्जून सांगायचे. पण ती गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचली की नाही, हे कोणालाच माहीत नाही. परागची पत्नी आणि मुलगी नेहमी त्याला भेटायला यायच्या. त्याचा भाऊही त्याला नेहमी भेटायला यायचा.
आई-वडीलही रुग्णालयात त्याच्यासाठी राहायचे. गेल्या ९ वर्षांच्या काळात या व्यक्तींना सगळेच जण ओळखायला लागले होते. परागमध्ये काय बदल होतो, प्रकृती सुधारली का याकडेच या कुटुंबीयांचे लक्ष लागलेले असायचे. शेवटपर्यंत सावंत कुटुंबीयांनी एकाही मिनिटासाठी परागला अंतर दिले नाही.