Join us  

'अग्निफेरा' मालिकेत पाहायला मिळणार एका लग्नाची अजब गोष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 3:40 PM

अग्नीमधील अनेक गुण आणि सुपर कार्स, फॅशन आणि त्याबाबतचे सर्वकाही जाणून घेण्याची तिची इच्छा यांमुळे किशनचा तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय आणखी पक्का होतो.

अग्निफेरा मालिकेत नुकत्याच घेण्यात आलेल्या २० वर्षांच्या लीपनंतर दोन्ही प्रमुख अभिनेत्री- युक्ती कपूर आणि सिमरन कौर- पूर्णपणे नवीन अवतारात दिसत आहेत. त्यांच्या पूर्वीच्या व्यक्तिरेखांच्या अगदी विरुद्ध भूमिकांमध्ये या दोघी आता आहेत. एक पोलिस अधिका-याची भूमिका करत आहे, तर दुसरी गँगस्टरच्या भूमिकेत आहे. या दोन्ही स्त्रियांच्या सापळ्यात अडकला आहे आणि त्या दोघींच्या अनोख्या गुणांकडे सारखाच आकर्षित झाला आहे किशन (करण गोडवानी). किशन त्याच्या कुटुंबाचा व्यवसाय चालवत आहे आणि आपल्या कुटुंबाचे नाव आणखी उंचीवर नेण्याचे लक्ष्य त्याच्यापुढे आहे. त्याच्या लग्नाची चर्चा सुरू करण्याचे छुपे प्रयत्न घरातले करत असतानाच, किशन त्याचे जिच्यावर प्रेम आहे त्या मुलीशी- अग्नीशी (युक्ती कपूर) लग्न करण्याचा निर्णय घेतो. अग्नीमधील अनेक गुण आणि सुपर कार्स, फॅशन आणि त्याबाबतचे सर्वकाही जाणून घेण्याची तिची इच्छा यांमुळे किशनचा तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय आणखी पक्का होतो.

भारतातील विवाहसोहळे म्हणजे भव्य-दिव्य साजरीकरण, भरपूर नाच-गाणी आणि स्मरणात राहणारी धमाल हे आपल्याला माहीत असेल तरी ज्यात थोडा गोंधळ होणार नाही, ते लग्न कसले. याच चैतन्याने आणि उत्साहाने किशन अग्नीसोबत सात फेरे घेऊन तिच्याशी आयुष्यभराचे नाते जोडण्यासाठी तयार आहे. मात्र, अग्नीवर सूड उगवण्याच्या उद्देशाने साक्षी (सिमरन कौर) किशन आणि त्याच्या कुटुंबासोबत एक खेळ खेळण्याचे ठरवते. ती घटनांना अशी काही वळणे देते की, अखेर किशनचे एकाच मांडवात अग्नी व साक्षी दोघींशी लग्न लागते. आता यातून जी काही वळणे मालिका घेईल त्यामुळे प्रेक्षकांचे खूप मनोरंजन होणार हे नक्की. भविष्यकाळाने आपल्यासाठी काय वाढून ठेवले आहे याची कल्पना नसलेला किशन नंतर एका फसव्या प्रेमत्रिकोणात अडकतो. हा त्रिकोण लग्नानंतर आकार घेत जातो.

या व्यक्तिरेखेबद्दल तसेच सध्या ती ज्या परिस्थितीत आहे, त्याबद्दल करण गोडवानी म्हणतो, “माझ्या व्यक्तिरेखेला म्हणजे किशनला जेव्हा त्याच्या मनातील अग्नीबद्दलच्या भावनांविषयी समजते आणि त्याचवेळी साक्षीच्या इच्छांविषयी समजते, तेव्हा ती व्यक्तिरेखा एका मोठ्या नाट्याच्या केंद्रस्थानी येऊन पोहोचते. हे कथानक खूपच रोचक आहे आणि सध्या टेलीव्हिजनवर चाललेल्या अनेक लग्नाविषयीच्या मालिकांतील कथानकांच्या तुलनेत खूपच वेगळे आहे. हा घटनाक्रम कथेला एका पूर्णपणे अकल्पित अशा दिशेला घेऊन जाईन आणि ही मालिका प्रेक्षकांसाठी अधिकच रोमांचक होऊन जाईल. मालिकेचा आतापर्यंतचा प्रवास उत्तम झाला आहे आणि ही मालिका स्वीकारली याचा मला आनंद वाटत आहे. प्रेक्षकांचा प्रतिसादही उत्तम आहे आणि ते यापुढेही माझ्यावर तसेच मालिकेवर असेच प्रेम करत राहतील अशी आशा मला वाटते.”