Join us  

Hirkani review: अपेक्षित प्रभाव पाडू न शकलेली 'हिरकणी'

By अजय परचुरे | Published: October 23, 2019 5:06 PM

हिरकणी एका रात्रीत तो कडा कसा उतरली असेल, सुदैवाने ती कडा उतरली तेव्हा कोजागिरीची रात्रं होती म्हणजेच चंद्राचा प्रकाश होता. पण तरी देखील तिला नेमक्या कोणत्या अडचणी आल्या असतील ह्याची ही शौर्यकथा

Release Date: October 24, 2019Language: मराठी
Cast: सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, अमित खेडेकर
Producer: इरादा एंटरटेनमेंटDirector: प्रसाद ओक
Duration: 1 तास 39 मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याच्या राजधानीसाठी किल्ले रायगड उभारला. १६७४ साली महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर संपन्न झाला. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ह्या किल्ल्याच्या बांधणी सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय चांगली होती. २७०० फूट उंची असलेल्या ह्या गडावर दरवाज्यांखेरीज कोणताही येण्याजाण्याचा मार्ग नव्हता. 'रायगडाचे दरवाजे बंद झाले की, खालून वर येईल ती फक्त हवा आणि वरून खाली जाईल ते फक्त पाणी'. पण ह्या गोष्टीला अपवाद ठरणारी एक स्त्री म्हणजेच 'हिरकणी' ह्या कथेवर आधारित हिरकणी हा सिनेमा अभिनेता प्रसाद ओक याने निर्माण केला. त्याने केलेला हा प्रयत्न वाखाण्याजोगा नसला तरी बरा आहे असं नक्कीच म्हणता येईल.किल्ले रायगडाच्या खाली काही अंतरावरील गावात बहिर्जी नाईकांच्या ताफ्यातील एका शूर मावळ््याचं (अमित खेडेकर) कुटुंब राहत असतं  घरात त्या व्यक्ती समवेत त्याची आई, बायको हिरा (सोनाली कुलकर्णी) व त्यांचे एक तान्हे बाळ राहत असे. घरातील दुभत्या गायी,म्हशींचं दूध विकून मिळणाºया पैश्यातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. त्याची बायको रोज सकाळी गडावरती दूध विकण्यास जात असे. एके दिवशी रोजच्याप्रमाणे हिरा गडावर दूध विकण्यास गेली, पण तिला त्या दिवशी काहीएक कारणाने दरवाजापर्यंत पोहोचण्यास उशीर झाला. ती गडाच्या दरवाजांजवळ आली, पण पाहते तर काय दरवाजे बंद झालेले होते. किल्लेदाराला तिने फार विनंती केली, पण त्यांनी दरवाजे उघडण्यास नकार दिला. कारण सकाळी उघडलेले दरवाजे सूर्यास्तानंतर बंद झाले कि, ते पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळीच उघडत असत. छत्रपतींची ही आज्ञा सर्वांना लागू होती. कोणालाही त्यासाठी मुभा नसे. पण हिराला आपल्या तान्ह्या बाळाची चिंता लागली होती. आईवाचून ते तान्हे बाळ रात्रभर कसे राहील, ह्या विचाराने त्या आईची चिंता वाढतच चालली. ह्या विचारातच हिराने किल्लाच्या कड्यावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. अंधारात कड्यावरून खाली जाणे म्हणजे जीव पणाला लावण्याच्या बरोबरीचे होते. कारण सर्वत्र खोल दºया, दाट झाडे-झुडपे आणि त्यात अंधार. पण बाळाच्या प्रेमापोटी ह्या मातेने हा निर्णय घेतला. गडाच्या कड्यांचे निरीक्षण केले. एका कड्यावर येऊन पोहोचली आणि त्याच कड्यावरून खडतर प्रवास करत ही माऊली आपल्या बाळापर्यंत पोहचते. महाराजांना ही गोष्ट कळताच महाराज हिराच्या या शौर्याचा यथोचित गौरव करतात आणि ज्या कठीण मार्गाने तिने प्रवास केला त्याला हिरकणी बुरूज असं नाव देतात. ही या सिनेमाची कहाणी 

कच्चा लिंबूनंतर प्रसाद ओकचा दिग्दर्शक म्हणून हा तिसरा सिनेमा. कच्चा लिंबूनंतर हिरकणी सारखा विषय प्रसादने घेतल्याने या सिनेमाविषयी बरीच उत्सुकता होती. मात्र या सिनेमाविषयी वाढलेल्या अपेक्षा बºयाचअंशी पूर्ण करण्यात प्रसाद ओकला अपयश आलं आहे. सिनेमाचा लूक जरी संजय मेमाणेंच्या लेन्समधून उत्तम असला तरी सिनेमात झालेलं सादरीकरण उत्तम आहे असं म्हणता येणार नाही. पहिल्या हाफमध्ये अपेक्षा उंचावलेला सिनेमा.. दुसऱ्या हाफमध्ये अपेक्षित उंची गाठण्यात कमी पडलाय. ४० मिनिटांच्या दुसºया हाफमध्ये हिरा कसा कडा उतरून येते याचं चित्रण आहे. मात्र अतिशय खडतर असणारी ही गोष्ट फारच वरवर मांडण्यात आली आहे. या दरम्यान हिराला येणाºया अडचणी,संकंटं यांचा अपेक्षित प्रभावच पडत नाही हे प्रसादचं सर्वात मोठं अपयश आहे.

हिराच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णीने केलेली मेहनत दिसून येतेय. मात्र गड उतरून येण्याच्या महत्वाच्या भागात तिला खडतर करण्यासारखं काहीच चित्रित करताना दिसत नसल्याने तिच्या या भूमिकेला वेगळे शेडस दिसत नाहीत. अमित खेडेकरने हिराच्या नवºयाच्या भूमिकेत सोनालीला योग्य साथ दिली आहे. सिनेमातील इतर कलाकारांनीही त्यांना दिलेली कामं योग्य केली आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने प्रसाद ओक आणि राजेश मापुसकर ही राष्ट्रीय पुरस्कार विजेती जोडी एकत्र आली असली तरी सिनेमा उत्कंठा वाढवण्यात कमी पडलेला आहे. अमितराजने या सिनेमातील गाण्यांना उत्तम संगीत दिलं आहे. शिवराज्याभिषेकावेळचं गाणं अप्रतिम चित्रितही झालंय आणि गायलंही छान. सिनेमाचा कार्यकारी निर्माता रत्नकांत जगताप आणि त्यांच्या टीमने प्रॉडक्शनमध्ये घेतलेली मेहनत मात्र नक्कीच वाखण्याजोगी आहे. मातृत्वाची शौर्यगाथा नक्कीच संस्मरणीय असली तरी सिनेमाच्या माध्यमातून मांडण्यात आलेली ही गाथा तितका प्रभाव पाडू शकली नाही हे दुर्देव आहे.     

 

 

टॅग्स :हिरकणीप्रसाद ओक सोनाली कुलकर्णी