विनोदाचा उत्तम सेन्स, ग्रामीण बोली, काहीसे ठेंगणे अशा आविर्भावात प्रेक्षकांच्या समोर येणारा एक हरहुन्नरी कलाकार म्हणजे अरुण कदम. रंगभूमी, चित्रपट आणि कॉमेडी एक्स्प्रेससारख्या शोमधून अभिनयाची छाप सोडलेल्या कदम यांनी रसिकांवर हास्याची कारंजी सोडली आणि विनोदात प्रेक्षकांना त्यांनी चिंब भिजवले. आता आगामी मिलिंद कवडे दिग्दर्शित ‘1234’ चित्रपटामधून पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसविण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते एक संवेदनशील अभिनेते असून, आपल्या वैशाली फाउंडेशनच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना निधी देण्याबरोबरच आपला वाढदिवस साजरा न करता हायवेवरील पोलीस हवालदारांना पाणी आणि केकचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे अमूल्य काम त्यांनी केले आहे. फिल्म मेकिंग, फोटोग्राफीचे प्रशिक्षण देणाऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये क्रिएटिव्ह प्रिन्सिपलपदी कार्यरत असलेल्या अरुण कदम यांनी सयाजी शिंदे यांच्या ‘नटरंग’ नाटकामधून विनोदी आणि गंभीर भूमिकेचे दर्शन घडविले. मात्र ‘लेकुरे उदंड झाली’ या नाटकामुळे नंतर विनोदी भूमिकाच वाट्याला आल्या. आपण गंभीर भूमिकादेखील करू शकतो, हे लोकांना पटत नसल्याची खंत ते व्यक्त करतात. केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्राची लोकधारा’मध्ये भरत जाधव, अंकुश चौधरी, संतोष पवार यांच्यासमवेत काम करण्याची संधी केदारने दिली. त्यात गण, गवळण, भारूड आदी लोककला सादर केल्या. त्या वेळी विनोदाचा एक दर्जा होता. कमरेखालचे विनोद होत नव्हते. कुटुंबातील सर्व व्यक्ती एकत्र बसून आस्वाद घेतील असाच विनोद असायला हवा, असा अट्टाहास होता. विनोदातूनही सामाजिक संदेश दिला जात असे. कोणत्याही कलेला स्टँडर्ड असावा, त्याचा दर्जा ढासळता कामा नये, असे कदम सांगतात. आज खेड्यापाड्यातील अनेक तरुण-तरुणी बॉलीवूडच्या आकर्षणापायी मुंबईमध्ये पाऊल ठेवतात. पण ज्याच्या अंगी खरी कला आहे, त्याला नक्कीच चित्रपटसृष्टीमध्ये काम आहे. मात्र स्ट्रगलही तितकाच आहे. त्यामुळे या क्षेत्रात या पण फार अपेक्षा ठेवून येऊ नका, असा सल्लाही ते तरुण पिढीला देतात.
कलेला ‘स्टँडर्ड’ असावा
By admin | Updated: December 30, 2015 03:22 IST