Join us

‘जज्बा’ला मिळाला सरासरी प्रतिसाद

By admin | Updated: October 15, 2015 01:58 IST

पाच वर्षांनंतर ऐश्वर्या रायचे ‘जज्बा’च्या रूपाने पडद्यावरील पुनरागमन हे बॉक्स आॅफिसवर फार सुखद म्हणता येणार नाही.

पाच वर्षांनंतर ऐश्वर्या रायचे ‘जज्बा’च्या रूपाने पडद्यावरील पुनरागमन हे बॉक्स आॅफिसवर फार सुखद म्हणता येणार नाही. संजय गुप्ता यांचे दिग्दर्शन असलेला ‘जज्बा’ बॉक्स आॅफिसवर अपेक्षेनुसार यश मिळवू शकला नाही. इरफान खान व ऐश्वर्या राय या जोडीचा हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर असून त्याची बॉक्स आॅफिसवरील सुरुवात मंद होती. पहिल्या दिवशी चित्रपटाने ४ कोटींच्या आसपास गल्ला जमवला. पुढच्या दोन दिवसांत (शनिवार व रविवार) तो ५-५ कोटींचा झाला. या हिशेबाने तीन दिवसांत चित्रपटाने जवळपास १५ कोटींची कमाई केली. ‘जज्बा’चे बजेट होते ३० कोटी रुपयांचे. चित्रपटाबद्दल वाईट बाब ही की सोमवारपासून त्याच्याबद्दलचे रिपोर्ट्स फारसे चांगले नाहीत. त्यामुळे चित्रपटावर परिणाम होऊ शकतो. तीन दिवसांच्या गल्ल्याच्या आधारावर ट्रेड विश्लेषक ‘जज्बा’ला अपयशी मानत आहेत. कारण चित्रपटांचे जाणकार या परिस्थितीत आणखी काही सुधारणा होईल असे मानत नाहीत. इरफान खानच्या जबरदस्त कामगिरीनंतरही ‘जज्बा’ला चांगला प्रतिसाद लाभला नाही.‘जज्बा’च्या आधी प्रदर्शित झालेल्या इरफानच्याच ‘तलवार’ने बॉक्स आॅफिसवर चांगली कामगिरी केल्याचे दिसते. नोएडातील आरुषी तलवार हत्याकांडाचा विषय असलेल्या ‘तलवार’चे दिग्दर्शन मेघना गुलजारने केले आहे. मात्र त्याची सुरुवात मंदच होती. त्याचे कारण म्हणजे अक्षयकुमारची भूमिका असलेला ‘सिंग इज ब्लिंग’ ‘तलवार’सोबतच प्रदर्शित झाला होता. पहिल्या तीन दिवसांत ९ कोटींची कमाई केलेल्या ‘तलवार’ने नंतरही आपली गती कायम राखली. दुसऱ्या वीकेण्डपर्यंत म्हणजे प्रदर्शित झाल्यापासून १० दिवसांत त्याने २२ कोटींपेक्षा जास्त गल्ला ओलांडला होता. चित्रपट बघणाऱ्यांच्या सकारात्मक प्रतिक्रियांमुळे ‘तलवार’ला फायदा होत असल्याचे समजले जाते.‘सिंग इज ब्लिंग’ची सुरुवात जोरदार ठरली. केवळ पहिल्या तीन दिवसांत ५० कोटींपेक्षा जास्त कमाई त्याने केली. ही बंपर ओपनिंग होती. या आधारावरच हा चित्रपट यश मिळवत राहील असे समजले गेले, परंतु नंतरच्या सात दिवसांत त्याचा गल्ला खालावत गेला. त्याचा परिणाम असा झाला की एकूण १० दिवसांत ७७ कोटींच्या गल्ल्यासोबत चित्रपटाच्या यशाची गती कमी होत गेली. ८० कोटी रुपये खर्च झालेल्या या चित्रपटाने अजून गुंतवणूकही वसूल केलेली नाही. त्याच्याबरोबर प्रदर्शित झालेल्या दक्षिणेतील मोठे नाव असलेल्या विजयचा पिरियड चित्रपट ‘पुली’मध्ये भव्यता असूनही तो हिंदी प्रेक्षकांना भावला नाही. त्याच्या डब आवृत्तीने तीन कोटींचीही कमाई केली नाही. त्याच्या डब आवृत्तीसाठी व त्याच्या जाहिरातींवर तीन कोटींपेक्षा जास्त खर्च झाला आहे. मधुर भांडारकरचा ‘कॅलेंडर गर्ल्स’ आधीच बॉक्स आॅफिसच्या शर्यतीतून बाहेर फेकला जाऊन या वर्षीच्या मोठ्या फ्लॉप चित्रपटांच्या यादीत बसला आहे. कॉमेडियन कपिल शर्माची भूमिका व अब्बास मस्तानचे दिग्दर्शन असलेल्या तसेच मोठे यश मिळाल्याचे ढोल बडवलेल्या ‘किस किस को प्यार करू’ला ५० कोटी रुपयांची उंचीही गाठता आलेली नाही.येत्या शुक्रवारी कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. तरीही प्रेक्षकांना तीन नवे चित्रपट बघण्याची संधी आहे. त्यात ‘प्यार का पंचनामा’चा सिक्वेल आणि नव्या कलाकारांची भूमिका असलेला ‘वेडिंग पुलाव’ शिवाय आमिर खानचा भाऊ फैजलचा चित्रपट ‘चिनार’चा समावेश आहे. परंतु या तिघांकडून कोणत्याच अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाहीत.