TCS Layoff News: देश आणि जगातील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) सध्या कर्मचारी कपातीवरुन वादात सापडली आहे. आयटी आणि आयटीईएस कर्मचारी संघटना युनिटनं गेल्या मंगळवारी चेन्नईमध्ये निषेध केला आणि टीसीएस सुमारे १२,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकत असल्याचा दावा करत त्यापैकी बहुतेक मध्यम आणि वरिष्ठ पातळीचे व्यावसायिक असल्याचं म्हटलं. फायनान्शियल एक्सप्रेसच्या बातमीनुसार, युनिटनं अशी भीतीही व्यक्त केली आहे की हा आकडा ३०,००० ते ४०,००० पर्यंत जाऊ शकतो. संघटनेचं म्हणणं आहे की कंपनी खर्च कमी करण्यासाठी अनुभवी कर्मचाऱ्यांना काढून त्यांच्या जागी कमी पगारावर फ्रेशर्सना कामावर ठेवत आहे.
चेन्नईमध्ये निषेध
निदर्शनादरम्यान, कामगार संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी बॅनर आणि पोस्टर्स घेऊन निषेध केला. दरम्यान, टीसीएसनं आता यावर प्रतिक्रिया दिली आहे आणि कर्मचारी कपातीची बातमी खोटी आणि दिशाभूल करणारी असल्याचं म्हटलं. कंपनीनं हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. कंपनीनं यासंदर्भात एक अधिकृत निवेदन जारी केलं आहे, ३०,००० कर्मचाऱ्यांच्या कर्मचारी कपातीची बातमी खोटी आणि दिशाभूल करणारी आहे. हा परिणाम आमच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या फक्त २% पर्यंत मर्यादित असल्याचं त्यांनी म्हटलंय.
वेतनवाढ होणार
दरम्यान, ऑगस्टमध्ये कंपनीने १ सप्टेंबर २०२५ पासून वेतनवाढीची घोषणा केली. कंपनीनं एका ईमेलमध्ये, टीसीएसचे जवळपास ८० टक्के कर्मचारी, म्हणजेच ५ पैकी ४ कर्मचारी या वेतनवाढीसाठी पात्र असल्याचं म्हटलं. मिंटच्या यापूर्वीच्या रिपोर्टनुसार, ही वाढ सुमारे ११ वर्षांचा किंवा त्यापेक्षा कमी अनुभव असलेल्या सी३ए बँडमधील कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळत आहे त्यांचा सीटीसी १५ लाख ते ३५ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. सी३बी, सी४ किंवा सी५ यासारख्या उच्च बँडमधील कर्मचाऱ्यांना अद्याप वेतनवाढीच्या या फेरीत समाविष्ट करण्यात आलेलं नसल्याचंही एका रिपोर्टमध्ये नमूद केलंय.