Aadhaar Card : आजच्या काळात आधार कार्डशिवाय जगणे अशक्य आहे. बँकेचे काम असो, मोबाईल सिम घेणे असो, सरकारी योजनांचा लाभ असो किंवा शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश असो, प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड आवश्यक असते. अगदी प्रवासातदेखील ओळखपत्र म्हणून आधारकार्डच मागतात. म्हणूनच प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
हे कार्ड 'यूआयडीएआय' (UIDAI - Unique Identification Authority of India) या संस्थेद्वारे जारी केले जाते. आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी यूआयडीएआयने काही कठोर नियम बनवले आहेत, ज्यांचे पालन करणे प्रत्येकासाठी बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास किंवा मोठा दंड होऊ शकतो. चला, त्या नियमांबद्दल जाणून घेऊया.
आधार बनवताना चुकीची माहिती देऊ नकाजर तुम्ही आधार कार्ड बनवताना यूआयडीएआयला तुमची योग्य माहिती दिली नाही आणि जाणूनबुजून खोटी माहिती सादर केली, तर तो एक गंभीर गुन्हा मानला जातो. यासाठी तुम्हाला ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा १०,००० रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. त्यामुळे आधार कार्डसाठी अर्ज करताना नेहमी सत्य आणि योग्य कागदपत्रे सादर करा.
दुसऱ्याच्या आधारमध्ये बदल करणेही गुन्हाएखाद्या व्यक्तीच्या आधार कार्डच्या माहितीत किंवा ओळखपत्रात बदल करणे किंवा छेडछाड करणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे केल्यास तुम्हाला ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा १०,००० रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. त्यामुळे, कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्याच्या आधार कार्डमध्ये कोणताही बदल करू नका.
डेटा लीक करणे पडेल महागातकाही वेळा लोक यूआयडीएआयची परवानगी न घेता आधार कार्डशी संबंधित एजन्सी उघडतात आणि लोकांची खासगी माहिती गोळा करतात. हे करणे कायद्याच्या विरोधात आहे. असे केल्यास संबंधित व्यक्तीला ३ वर्षांचा तुरुंगवास आणि १०,००० रुपयांचा दंड होऊ शकतो. जर एखाद्या कंपनीने असा गुन्हा केला, तर त्यांना १ लाख रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. याशिवाय, कोणाचीही वैयक्तिक माहिती लीक करणे किंवा ती अनधिकृत व्यक्तीला देणे हा देखील गुन्हा आहे, ज्यासाठी तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते.
वाचा - टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
आधार केंद्रावर चोरी केल्यास कठोर शिक्षाजर कोणी आधार केंद्रावर हॅकिंग केले किंवा डेटा चोरण्याचा प्रयत्न केला, तर तो सर्वात मोठा गुन्हा मानला जातो. अशा गुन्हेगाराला १० वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १०,००० रुपयांपासून १० लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.