Join us

मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 09:57 IST

कच्चे पाम तेल, कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलावरील मूलभूत कस्टम ड्युटी निम्म्याने कमी करण्यात आली आहे.

कोरोनाची पहिली लाट आल्यापासून महागाईत पिचलेल्या सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने  खाद्यतेलाच्या किंमती कमी करण्यासाठी कस्टम ड्युटी कमी केली आहे. कच्चे पाम तेल, कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलावरील मूलभूत कस्टम ड्युटी निम्म्याने कमी करण्यात आली आहे. यामुळे सुमारे १० टक्क्यांपर्यंत खाद्यतेलाच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. 

खाद्य तेलावरील कस्टम ड्युटी सध्या २० टक्के होती ती १० टक्क्यांवर करण्यात आली आहे. भारताला एकूण गरजेच्या ५० टक्के खाद्य तेल आयात करावे लागते. शुक्रवारी याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली. यानुसार खाद्य तेलावरील आयात शुल्क हे २७.५ टक्क्यांवरून १६.५ टक्के करण्यात आले आहे. परंतू आयात होणाऱ्या रिफाइंड तेलांवरील प्रभावी शुल्क ३५.७५ टक्केच ठेवण्यात आले आहे. 

देशांतर्गत प्रक्रिया करणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी कच्च्या आणि रिफाइंड खाद्यतेलांमधील शुल्कातील फरक वाढवण्याची मागणी करण्यात येत होती. यामुळे आता स्वदेशी रिफाईंड तेलाच्या किंमती कमी होणार आहेत. याचा फायदा छोट्या मोठ्या तेल उत्पादकांनाही होणार आहे. भारत मलेशिया आणि इंडोनेशियामधून पाम तेल आयात करतो. कच्च्या पाम तेलापेक्षा रिफाईंड पाम तेल स्वस्त होते, यामुळे त्याची आयात जास्त केली जात होती. या दोघांमधील शुल्कातील फरक १९.२५ टक्के करण्याची मागणी करण्यात येत होती. 

केंद्राच्या या निर्णयाचे SEA आणि इंडियन व्हेजिटेबल ऑइल प्रोड्युसर्स असोसिएशन (IVPA) यांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे खाद्यतेलांच्या किरकोळ किमती कमी होण्यासही मदत होईल, असे एसईएचे कार्यकारी संचालक बी.व्ही. मेहता यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :महागाई