Join us  

...तर शेअर बाजार कायमचा बंद होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 2:59 AM

झुनझुनवाला क्लबच्या टिष्ट्वटने खळबळ उडाली

मुंबई : ‘‘पंतप्रधान व अर्थमंत्री मॅडम यांना कर महसूल वाढवायचा आहे हे देशासाठी चांगले आहे. पण गुंतवणूक नाही त्यामुळे देशभर आर्थिक मंदी आहे व त्यामुळे शेअर बाजार कायमचा बंद होऊ शकतो व तसे झाले तर व्यापारीही आत्महत्या करतील’’ असे टष्ट्वीट झुनझुनवाला क्लबने केल्याने आर्थिक बाजारात खळबळ उडाली आहे.

अर्थसंकल्पात दोन ते पाच कोटी व त्यापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या श्रीमंताच्या आयकरावर तीन व सात टक्के अधिभार लावला आहे. त्यामुळे दोन ते पाच कोटी उत्पन्नावर ३९ टक्के व पाच कोटीपेक्षा जास्त उत्पन्नावर ४३ टक्के आयकर लागणार आहे. भारतात विदेशातील पेन्शन फंडस इन्शुरन्स कंपन्या व इतर गुंतवणूकदार ट्रस्ट (न्यास) स्थापन करून शेअर बाजारात गुंतवणूक करतात. त्यांना आता हे दर लागू झाले आहेत. या गुंतवणूकदारांना सरकार अधिभार परत घेईल अशी आशा होती. पण गेल्या गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अशी कुठलीही सवलत देण्यास नकार दिल्याने या गुंतवणूकदारांची निराशा झाली.

याचा परिणाम म्हणून गेल्या शुक्रवारी विदेशी गुंतवणूकदारांनी २५००० कोटी, व सोमवार ते बुधवार या दरम्यान पुन्हा ३५००० कोटी शेअर बाजारातून काढून घेतले. परिणामी सेन्सेक्स जवळपास २२०० अंकानी व निफ्टी अंदाजे ९०० अंकांनी घसरले आहेत. झुनझुनवाला क्लबच्या बीटमधून अर्थव्यवस्थेची ही विदारक परिस्थिती समोर आणली आहे. विदेशी गुंतवणूकदार निघून गेले तर शेअर बाजार कायमचा बंद पडेल व आर्थिक मंदीमुळे सामान्य व्यापारीही आत्महत्या करू लागतील असा इशारा सरकारला दिला आहे. आता यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन कुठला दिलासा देणार ते पहाणे रंजक ठरेल.

टॅग्स :शेअर बाजार