Tata Salt Story: टाटा समूह हे भारतातील एक प्रसिद्ध औद्योगिक घराणं आहे, ज्याला १२५ वर्षांचा इतिहास आहे. सव्वाशे वर्षांच्या या प्रवासात टाटा समूहानं ट्रकपासून स्टीलपर्यंत मोठ्या व्यवसायात आपला ठसा उमटवला. टाटा समूहाने स्टील आणि ट्रक सारख्या वस्तूंच्या निर्मितीव्यतिरिक्त मिठाच्या व्यवसायात का प्रवेश केला हे तुम्हाला माहित आहे का? टाटा सॉल्टचं नाव प्रत्येक देशवासीयांच्या तोंडावर आहे. परंतु, या मिठाची कहाणी फार कमी लोकांना माहीत आहे. विशेष म्हणजे दिवंगत रतन टाटा यांना मीठ विकण्याची कल्पना सुचली होती, पण ती व्यवसायासाठी नव्हे तर चांगल्या कारणासाठी सुरू करण्यात आली होती.
रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाला जगभरात ओळख मिळाली. त्यांनी चहापासून टाटा मीठ प्रत्येक देशवासींयाच्या घरी पोहोचवलं. इतकेच काय, या व्यवसायात रतन टाटा यांनी सार्वजनिक कल्याणाला प्राधान्य दिलं, आपल्या उत्पादनांमध्ये आपल्या आरोग्याची आणि चवीची काळजी घेतली गेली.
टाटांच्या मिठाची सुरुवात कशी झाली?
खरं तर देशातील आयोडीनच्या कमतरतेची समस्या लक्षात घेऊन रतन टाटांनी लोकांच्या आरोग्याची आणि चवीची काळजी घेणारा एक उपाय शोधून काढला. चाळीस वर्षांपूर्वी भारतात बहुतेक लोक सुटं मीठ विकत घेत असत, जे स्वच्छ किंवा आयोडीनयुक्त नव्हतं. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी १९८३ मध्ये टाटा केमिकल्सनं भारतात पॅकेट्समध्ये पहिलं ब्रँडेड आयोडीनयुक्त मीठ बाजारात आणलं. टाटा मीठ हे देशातील पहिलं आयोडीनयुक्त पॅकेज्ड मीठ ठरलं, ज्यानं लोकांना चांगलं आरोग्य दिलं आणि कालांतरानं हे मीठ इतकं लोकप्रिय झाले की बहुतांश घरात हे मीठ दिसू लागलं.
डीएनएच्या रिपोर्टनुसार, टाटा समूहानं १९२७ मध्ये गुजरातमधील ओखा येथे मीठ उत्पादन सुरू केलं. तथापि, कंपनीने १९८३ मध्ये आयोडीनयुक्त मीठ पॅकेटमध्ये विकून मीठ किरकोळ विक्री सुरू केली. हे मीठ आयोडीन आणि लोहाची कमतरता भरून काढण्याची क्षमता तसंच रक्तदाब नियंत्रित करण्यात त्याच्या संभाव्य भूमिकेसाठी ओळखलं जातं.