Join us  

सुभाष चंद्रांनी मागितली गुंतवणूकदारांची माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 3:52 AM

झी व एस्सेल समूहाचे सर्वेसर्वा सुभाषचंद्रा यांनी आपले सर्व गुंतवणूकदार आणि कर्ज देणाऱ्या सर्व बँकांची माफी मागितली आहे.

नवी दिल्ली : झी व एस्सेल समूहाचे सर्वेसर्वा सुभाषचंद्रा यांनी आपले सर्व गुंतवणूकदार आणि कर्ज देणाऱ्या सर्व बँकांची माफी मागितली आहे. ५२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच मला बँकर, म्युच्युअल फंड, बिगर बँकींग वित्तीय संस्थांची माफी मागावी लागत आहे. प्रत्येकाचे कर्ज परत करण्यास मी बांधील आहे, असेही त्यांनी म्हटले.सुभाष चंद्रा यांच्या झी समूहाच्या अनेक वाहिन्या आहेत. हिंदी, इंग्रजी, मराठीसह अनेक भारतीय भाषांतील त्यांच्या मनोरंजनाच्या वाहिन्या विविध कार्यक्रमांमुळे लोकप्रियही ठरल्या आहेत. तरीही त्यांच्यावर ही स्थिती का ओढावली, याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.त्यांची एस्सेल इन्फा चार ते पाच हजार कोटी रुपयांच्या तोट्यात आहे. शेअर विक्री करुन कर्ज घेऊन व्याज व मूळ रक्कम चुकती करावी लागत आहे. त्यातच शुक्रवारी एकाच दिवसात एस्सेल ग्रुप कंपनीचे शेअर १८ ते २१ टक्क्यांनी घसरले आणि गुंतवणुकदारांनी १४ हजार कोटी काढून घेतले. त्यामुळे सुभाष चंद्रा यांना माफी मागण्याची वेळ आली आहे.त्यांनी म्हटले आहे की, मी माझ्या वित्तीय समर्थकांची माफी मागतो. मी नेहमीच माझ्या चुका स्वीकारल्या आहेत. मी घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी घेत आलो आहे. माझ्या ५२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच मला बँकर, म्युच्युअल फंड, बिगर बँकींग वित्तीय संस्थांची माफी मागावी लागत आहे. कारण, कोणीही कर्ज फेडण्यासाठी आपल्या मुकुटातील हिरा विकत नाही. काही जण आम्हाला यशस्वी होऊ द्यायला तयार नाहीत. मात्र यात माझी काही चूक नाही, असे मी म्हणणार नाही. मी त्याची शिक्षा स्वीकारण्यास तयार आहे. मी प्रत्येकाचे कर्ज चुकते करेनच.चंद्रा यांनी गुंतवणूकदारांना लिहिलेल्या पत्राचा हे सारे लिहिले आहे. त्यांची एस्सेल इन्फा चार ते पाच हजार कोटी रुपयांच्या तोट्यात आहे. शेअर्सची विक्री करुन आणि कर्ज घेऊन व्याज व मूळ रक्कम परत करण्याची वेळ माझ्यावर आली आहे. ते म्हणतात : स्वातंत्र्यानंतर बहुतांश नवे उद्योग तोट्यात राहिले आहेत. आयएलअँडएफएसचा मुद्दा समोर आल्यानंतर स्थिती आणखी बिघडली आहे. आयएलअँडएफएस बुडाली, तर आम्हा सर्वांवर त्याचा परिणाम होणार आहे. आयएलअँडएफएसकडून कर्ज घेऊन अनेक संस्था आपल्या कर्जाची परतफेड करतात.नकारात्मक शक्तींचा प्रचारसुभाष चंद्रा म्हणतात की, काही नकारात्मक शक्ती माझ्याविरुद्ध प्रचार करत आहेत. त्यांनी महाराष्ट्र पोलिसांकडे तक्रार केली आहे. मात्र, काहीही कारवाई झालेली नाही. शुक्रवारी एकाच दिवसात एस्सेल ग्रुप कंपनीचे शेअर १८ ते २१ टक्क्यांनी घसरले आणि गुंतवणूकदारांनी १४ हजार कोटी काढून घेतले.

टॅग्स :व्यवसायशेअर बाजार