Join us  

शेअर बाजाराची बम्पर सुरुवात, सेन्सेक्स पोहोचला ३३ हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 11:21 AM

शेअर बाजासाठी बुधवारचा दिवस खरोखरच खूप महत्त्वपूर्ण असा ठरला. शेअर बाजारात बुधवारी बम्पर अशी सुरुवात झाली.

नवी दिल्ली - शेअर बाजासाठी बुधवारचा दिवस खरोखरच खूप महत्त्वपूर्ण असा ठरला. शेअर बाजारात बुधवारी बम्पर अशी सुरुवात झाली. शेअर बाजार सुरू होताच तब्बल 450  अंकांनी निर्देशांक वधारला आणि 33 हजार 086 रुपयांवर पोहोचला तर निफ्टीनेही 10,300 अंक पार करत नवा विक्रम केला. मंगळवारी अर्थव्यवस्थेतील मगरळ दूर करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना नवसंजीवनी देण्यासाठी केंद्र सरकारने 2.11 लाख कोटी रुपयांचे साहाय्य आणि  6 कोटी 90 लाख रुपयांच्या रस्ते प्रकल्पांची घोषणा केल्यानंतर याचे परिणाम बुधवारी शेअर बाजारावरही दिसले, असे म्हटले जात आहे.

बुधवारी (25 ऑक्टोबर) बाजार उघडताच पीएययु बँक निर्देशांक 22 टक्क्यांनी वधारला. एसबीआय, पीएनबी, एचडीएफसीसह अनेक बँकांच्या समभागांनी उसळी घेतली. त्यामुळे मंगळवारच्या केंद्र सरकारच्या घोषणांचाच परिणाम असल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी केंद्र सरकारनं 6 कोटी 90 लाख रुपयांच्या रस्ते प्रकल्पांची घोषणेसोबत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी 2.11 लाख कोटी रुपयांचे साहाय्य जाहीर केले. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दोन महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती देण्यासोबत असाही दावा केली, अर्थव्यवस्थेचा पाया फार मजबूत आहे. हे सिद्ध करण्यासाठी अर्थमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिका-यांनी प्रेझेंटेशनदेखील सादर केले होते. 

मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला ९ लाख कोटींचे ‘टॉनिक’, आजारी बँकांना दोन लाख कोटींचे भांडवल

पाया मजबूत असूनही प्रासंगिक कारणांमुळे आलेली मरगळ दूर होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला नव्याने झेप घेण्यासाठी उभारी मिळावी, यासाठी 9 लाख कोटी रुपयांच्या ‘टॉनिक’ची घोषणा केंद्र सरकारने मंगळवारी केली. यात बुडित व थकित कर्जांखाली दबलेल्या सरकारी बँकांना भांडवलपूर्तीसाठी 2 लाख 11 हजार कोटी देण्याचा व ‘सागरमाला’ या महत्त्वाकांक्षी योजनेसह अन्य महामार्ग वरस्ते बांधणीसाठी तब्बल सात लाख कोटी रुपये खर्च करण्याचा समावेश आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांच्या खात्याच्या वित्त, वित्तीय सेवा, महसूल या तिन्ही विभागांचे सचिव आणि मुख्य आर्थिक सल्लागारांना सोबत घेऊन, देशाची अर्थव्यवस्थेला ठराविक क्षेत्रांत थोडासा टेकू दिला, तर ती पुन्हा जलद विकासाच्या दिशेने धाव घेण्यास सक्षम आहे, असा दावा केला. या दाव्याच्या पुष्ट्यर्थ अर्थ मंत्रालयाने 29 पानांचे एक पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशनही केले. अपेक्षेनुसार खासगी गुंतवणूक नसल्याने, अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकारनेच सढळ हस्ते खर्च करण्याची गरज आहे. आर्थिक सर्वेक्षणासह अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीविषयी पंतप्रधानांशी चर्चा केली व हे उपाय योजल्याचे जेटलींनी सांगितले.

‘काळा दिवस’वाले उघडे पडतील : नोटाबंदीच्या पहिल्या वर्धापन दिनी येत्या 8  नोव्हेंबर रोजी देशभर ‘काळा दिवस’ पाळण्याच्या विरोधी पक्षांच्या घोषणेवर जेटली म्हणाले की, त्यांनी जरूर तसे करावे. मात्र, त्यातून ते रोखीच्या अर्थव्यवस्थेचे समर्थक म्हणून उघडे पडतील. सरकारचा मात्र, अर्थव्यवस्थेतील रोखीचे व्यवहार कमी करण्याचा निर्धार कायम आहे व त्यासाठी यापुढेही पावले टाकली जातील.बँकांकडे पतपुरवठा करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे. मात्र, त्याला जोड देण्यासाठी त्या प्रमाणात भांडवलाची कमतरता असल्याने बँकांच्या पतपुरवठ्यास मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे आजारी सरकारी बँकांना 2.11 लाख कोटी रुपयांचे भांडवल दिले जाईल, असे जेटली म्हणाले. बँकांच्या भांडवलपूर्तीसाठी सरकारकडून दिली जाणारी आजवरची ही सर्वात मोठी रक्कम असेल.यापैकी 76 हजार कोटी केंद्रीय अर्थसंकल्पातून, निर्गुंतवणूक करून व बाजारातून कर्ज घेऊन दिले जातील, तर बाकीची 1.35  लाख कोटी रुपयांची रक्कम यासाठी विशेष कर्जरोखे काढून उभारली जाईल. हे नवे भांडवल दिल्यानंतर बँका पुन्हा पूर्वीच्या मार्गाने जाऊ नयेत, यासाठी खास सुधारणा कार्यक्रमही राबविला जाईल, असे जेटली म्हणाले.मध्यम, लघू आणि सूक्ष्म उद्योगांमध्ये (एमएसएम) अधिकाधिक रोजगारक्षमता असल्याने, बँकांकडून त्यांना वित्तसाह्य देण्यासाठी विशेष योजना राबविण्यावर भर दिला जाईल, असेही जेटली म्हणाले. 

राहुल गांधींना प्रतिटोलासोमवारी गुजरातमधील सभेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘जीएसटी’ म्हणजे, ‘गब्बर सिंग टॅक्स’ असे म्हणून टीका केली. त्याविषयी विचारता जेटली यांनी असा प्रतिटोला हाणला की, ज्या लोकांना २-जी आणि कोळसा खाणवाटप घोटाळ्यांची सवय झाली आहे, त्यांचा उजळ माथ्याने रास्त कर भरण्यास आक्षेप असणे स्वाभाविकच आहे!

टॅग्स :अर्थव्यवस्था