Join us

आरटीजीएसची वेळ सायं. सहापर्यंत वाढविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 03:55 IST

ऑनलाईन प्रणालीने तात्काळ निधी हस्तांतरण (आरटीजीएस) करण्याची वेळ एक जूनपासून सर्वसामान्य जनतेसाठी दीड तासांनी वाढवून सायंकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात आली आहे,

मुंबई : ऑनलाईन प्रणालीने तात्काळ निधी हस्तांतरण (आरटीजीएस) करण्याची वेळ एक जूनपासून सर्वसामान्य जनतेसाठी दीड तासांनी वाढवून सायंकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात आली आहे, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने सांगितले. रिअल टाईम ग्रॉस सेटलमेन्ट (आरटीजीएस) ही अखंड आणि वास्तविक वेळेत निधी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया आहे.मुख्यत्वे ही प्रणाली मोठा निधी हस्तांतरित करण्यासाठी आहे. आरटीजीएसप्रणालीच्या माध्यमातून किमान दोन लाख रुपये हस्तांतरित करता येत असले तरी कमाल मर्यादा नाही. आता या प्रणालीतहत ग्राहकांसाठी निधी हस्तांतरित करण्याची वेळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सुविधा एक जूनपासून उपलब्ध होईल, असे रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेत म्हटले आहे. राष्टÑीय इलेक्ट्रॉनिक्स निधी हस्तांतर (एनईएफटी) ही सुद्धा दुसरी लोकप्रिय प्रक्रिया आहे. यात हस्तांतरणासाठी किमान-कमाल मर्यादा नाही.