Join us  

मनी ट्रान्सफरसाठी वापरली जाणारी बँकांची ही सेवा १४ तासांसाठी राहणार बंद, RBIने केले असे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 10:19 AM

मुंबई - मनी ट्रान्सफर करणारी आरटीजीएस (रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट) सेवा शनिवारी मध्यरात्रीपासून १४ तासांसाठी बंद असेल अशी माहिती ...

मुंबई - मनी ट्रान्सफर करणारी आरटीजीएस (रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट) सेवा शनिवारी मध्यरात्रीपासून १४ तासांसाठी बंद असेल अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे. डिझास्टर रिकव्हरी च्या वेळेला अधिक सुधारण्यासाठी तांत्रिकदृष्या अद्ययावत करण्यासाठी ही सेवा काही वेळासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन लाख रुपयांहून अधिकची रक्कम पाठवण्यासाठी या सेवेचा उपयोग केला जातो. तर यादरम्यान, २ लाख रुपयांपर्यंतच्या देवघेवीसाठी वापरण्यात येणारा नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर (एनईएफटी) पूर्वीप्रमाणेच काम करत राहणार आहे. (RTGS service of banks used for money transfer will be closed for 14 hours)

याबाबत माहिती देताना रिझर्व्ह बँकेने सांगितले की, १७ एप्रिल रोजी कामकाज संपल्यानंतर आरटीजीएस प्रणालीची क्षमता सुधारण्यासाठी तसेच डिझास्टर रिकव्हरीच्या वेळेत अधिक सुधारणा करण्यासाठा आरटीजीएसला अपडेट करण्यात येणार आहे. 

भारतीय रिझर्व्ह बँकेने सांगितले की, आरटीजीएस सेवा १८ एप्रिल रोजी रात्री (शनिवारी रात्री) ००.०० वाजल्यापासून रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. सदस्य बँकांनी आपल्या ग्राहकांना त्यानुसार आपल्या व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याची सूचना करावी. आरटीजीएस सुविधा गेल्यावर्षी १४ डिसेंबरपासून २४ तास उपलब्ध आहे. भारत त्या मोजक्या देशांमध्ये आहे जिथे ही सुविधा २४ तास काम करते. 

भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात आपल्या पतधोरणाची समीक्षा केली होती. त्यावेळी आरटीजीएस आणि एनईएफटीसाख्या सुविधा अन्य काही संस्थांनाही सुरू करण्याची घोषणा केली होती. या तरतुदीमुळे आरबीआयन फिनटेक आणि पेमेंट कंपन्यांनासुद्धा सेंट्रलाइज पेमेंट सिस्टिमच्या या दोन पर्यायांमध्ये सामील करून घेतले आहे. आतापर्यंत ही सुविधा केवळ बँकांसाठीच उपलब्ध होती. 

टॅग्स :बँकिंग क्षेत्रभारतभारतीय रिझर्व्ह बँक