Join us

1 डिसेंबरपासून 'रिलायन्स'ची व्हाइस कॉल सेवा होणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 11:15 IST

उद्योगपती अनिल अंबानी यांची रिलायन्स कम्युनिकेशन  (आरकॉम)  कंपनी येत्या 1 डिसेंबरपासून 'व्हाइस कॉल सर्व्हिस' बंद करणार आहे.

मुंबई - उद्योगपती अनिल अंबानी यांची रिलायन्स कम्युनिकेशन  (आरकॉम)  कंपनी येत्या 1 डिसेंबरपासून 'व्हाइस कॉल सर्व्हिस' बंद करणार आहे. त्यामुळे 31 डिसेंबर 2017 पर्यंत ग्राहकांनी दुसऱ्या नेटवर्ककडे वळावे अशी माहिती भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने शुक्रवारी दिली. 1 डिसेंबरला रिलायन्सची व्हाइस कॉल सर्व्हिस बंद करण्यात आली तरी 31 डिसेंबरपर्यंत आरकॉमच्या ग्राहकांचे नंबर कन्व्हर्ट करून घेण्याची विनंती मान्य करण्याचे आवाहनही टेलिकॉम कंपन्यांना करण्यात आल्याचं आरकॉमनं स्पष्ट केलं आहे.  1 डिसेंबर 2017 पासून ग्राहकांना फक्त 4G सेवाच देऊ शकतो, त्यामुळे व्हॉईस कॉलिंग देऊ शकणार नाही, असं आरकॉमने म्हटल्याचं ट्रायने सांगितलं आहे. तसंच याबाबतची सर्व सुचना ग्राहकांना आधीच दिल्याचंही आरकॉमनं म्हटलं आहे. कंपनी सध्या विलिनीकरण होणारी कंपनी सिसतेमा श्याम टेलीसर्व्हिसेसचं सीडीएमए नेटवर्क अपग्रेड करत आहे. यामुळे दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश पश्चिम, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरात आणि कोलकातामध्ये 4G नेटवर्क उपलब्ध करुन देता येईल, असंही आरकॉमने ट्रायला सांगितलं.आरकॉमवर सध्या 46 हजार कोटींचं कर्ज आहे. या कंपनीने वायरलेस उद्योगाचं विलिनिकरण करण्याचा करार एअरसेलसोबत केला होता. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये या करारावर सह्याही झाल्या होत्या. मात्र काही दिवसापूर्वीच हा करार रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे टुजी मोबाइल सेवेचा गाशा गुंडाळल्यानंतर आरकॉमने येत्या 1 डिसेंबरपासून 'व्हाइस कॉल सर्व्हिस' बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :अनिल अंबानीरिलायन्स कम्युनिकेशन