नवी दिल्ली : निती आयोगाच्या उद्या, बुधवारी होणा-या बैठकीत आर्थिक स्थितीचा तपशील पंतप्रधान मोदी समजावून घेणार आहेत. अर्थमंत्री अरूण जेटली, देशातले ३६ मान्यवर अर्थतज्ज्ञ व सरकारचे उच्चपदस्थ अधिकारी यावेळी उपस्थित असतील. बैठकीत कृषी, आरोग्य, शिक्षण व रोजगार आदी विषयांवर मंथन होणार असून त्यातील निर्णयांची छाप केंद्रीय अर्थसंकल्पावर पडलेली दिसेल.या बैठकीसाठी अर्थतज्ज्ञांचे ६ गट तयार करण्यात आले. ६ प्रमुख क्षेत्रांबाबत पंतप्रधानांसमोर हे गट आपली मते मांडतील. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने (सीएसओ) अलीकडेच आर्थिक वर्ष २0१७/१८ मधे विकास दर ६.५ टक्के राहील, मात्र कृषी क्षेत्राच्या विकास दराचा अंदाज अवघा २.१ टक्के असेल असा अंदाज मांडला. कृषी क्षेत्राचा अंदाज सरकारची चिंता वाढवणारा आहे. त्यामुळे बैठकीचा झोत कृषी क्षेत्रावर असू शकेल.पंतप्रधानांनी शेतक-यांचे उत्पन्न २0२२ पर्यंत दुप्पट करून दाखवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे एक गट या क्षेत्राची स्थिती सुधारण्याचे उपाय बैठकीत सुचवेल. दिवसभरातील चर्चेनंतर विकास दरात वृद्धी कशी घडवता येईल, रोजगार वाढवण्यासाठी ठोस उपाय योजावेत, याविषयी मोदी सर्वांशी चर्चा करतील.
अर्थव्यवस्थेबाबत पंतप्रधान करणार चर्चा, निती आयोगाची उद्या होणार बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 23:55 IST