Join us  

निर्लेप उद्योग समूह बजाज इलेक्ट्रीकल्सकडून टेकओव्हर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 8:10 PM

भारतामध्ये १९७० च्या दशकात पाककलेसाठी लागणारी उत्पादने नॉनस्टीक टेक्नोलॉजीतून आणून क्रांती करणारा निर्लेप उद्योग समूह बजाज इलेक्ट्रीक्ल्सकडून टेकओव्हर होणार आहे. येत्या सहा महिन्यांत धोरणात्मक बाबींचा विचार होऊन हा व्यवहार पूर्ण होईल.

पुढच्या सहा महिन्यांत होणार व्यवहार: ७० च्या दशकात भारतात आणली नॉनस्टीक टेक्नॉलॉजी 

औरंगाबाद : भारतामध्ये १९७० च्या दशकात पाककलेसाठी लागणारी उत्पादने नॉनस्टीक टेक्नोलॉजीतून आणून क्रांती करणारा निर्लेप उद्योग समूह बजाज इलेक्ट्रीक्ल्सकडून टेकओव्हर होणार आहे. येत्या सहा महिन्यांत धोरणात्मक बाबींचा विचार होऊन हा व्यवहार पूर्ण होईल. सध्या ४२.५० कोटी रुपयांमध्ये निर्लेपचे बजाज इलेक्ट्रीक्लसकडे हस्तांतरण झाल्याचे बोलले जात असले तरी अद्याप रक्कम ठरली नसल्याचे निर्लेप उद्योग समुहाचे सर्वेसर्वा राम भोगले यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. दोन्ही उद्योगोंमधील व्यवहारानुसार ८० टक्के समभाग बजाज इलेक्ट्रीक्ल्सकडे तर २० समभाग स्वत:कडे राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भोगले म्हणाले, ब्रॅण्डच्या हिताचे काही निर्णय घ्यावे लागतात. मार्केटची परिस्थिती,गरजा आणि गुंतवणुकीचा आवाका याचा विचार केला तर आपली ताकद किती आहे, याचा विचार करणे शिकले पाहिजे. ताकदीच्या बाहेर काही गोष्टी होत असल्याचे चिकटून राहणे योग्य राहिले नसते. इतर विकासाच्या गरजा वाढल्या आहेत. यामध्ये सकारात्मक बाब एकच आहे की, हा उद्योग पक्क्या भारतीय कंपनीकडे गेला आहे. ५० वर्षांत एवढ्या बाबी बदलल्या आहेत. सतत बदलणा-या जगात तुम्ही कसे राहता. याचा विचार करणे गरजेचे आहे. कंपनीच्या उत्कर्षासाठी त्यावरील आपला हक्क सोडावा, याचा विचार केला आहे. बजाज इलेक्ट्रीक्लसचे ८० टक्के समभाग असतील. आमचे २० टक्के समभाग असतील. निर्लेप या बॅ्रण्डसाठीच हा व्यवहार केला आहे. नॉनस्टीकमध्ये एवढा मोठा व्यवहार फक्त ब्रॅण्डमुळेच झाला आहे. करारामधील महत्वाचा मुद्दा म्हणजे,भारतीय बॅ्रण्ड वाढविणे, त्याची विश्वसनीयता कायम ठेवणे हा आहे. व्यवहाराच्या स्टेप्स वेगळ्या असतात. सध्या निर्णय झाला आहे. आर्थिक व्यवहार होण्यासाठी सहा महिने तर लागतील. कायदेशीर बाबी असतात, त्यामुळे उशीर होईल.  या व्यवहारातून उपलब्ध झालेली रक्कम वाळूजच्या उद्योगांमध्ये गुंतवणुक करता येईल. निर्लेपचे उत्पादन फक्त औरंगाबादमध्येच होत आहे. निर्यातीमध्ये चांगला टक्का होता. बजाजला सेलेबल ब्रॅण्ड, तंत्रज्ञान आणि रिलायबल भागीदार मिळाले आहेत. त्यामुळे ब्रॅण्ड निश्चितपणे पुढे जाईल. 

का विकले निर्लेपचे शेअर्स...निर्लेप उद्योग समूह मागील तीन वर्षांपासून मार्केट शेअरमध्ये मागे पडत आहे. तीन वर्षांत दरवर्षी होणारी उलाढाल पाहता कंपनीला तोटा सहन करावा लागला आहे. शिवाय या क्षेत्रात बहुराष्ट्रीय कंपन्यासमोर आणि त्यांच्या मार्केटींग धोरणासमोर निर्लेपचा निभाव लागणे अवघड होत चालले होते. २०१६ साली ७९ कोटी, २०१७ साली ५४ कोटी, २०१८ साली ४७ कोटींची वार्षिक उलाढाल कंपनीची असल्याची माहिती समोर आली आहे. हा सगळा व्यवहाराचा आलेख पाहता निर्लेप ब्रॅण्डच्या उत्कर्षासाठीच शेअर्स विकण्याचा निर्णय झाल्याचे दिसते आहे. 

टॅग्स :व्यवसायऔरंगाबाद