Join us

"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 10:17 IST

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं (TCS) १२,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली. त्यामुळे एआय आणि ऑटोमेशनच्या वाढत्या प्रभावामुळे येत्या काळात अशी आणखी प्रकरणं समोर येण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं (TCS) १२,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली. त्यामुळे एआय आणि ऑटोमेशनच्या वाढत्या प्रभावामुळे येत्या काळात अशी आणखी प्रकरणं समोर येण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. टीसीएसनं १२,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे, जी एकूण ६.१३ लाख कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या २ टक्के आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका मिड आणि सीनिअर पातळीवरील कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. टीसीएसनं ही कपात भविष्याकडे पाहून करत असल्याचं म्हटलं.

पीटीआयच्या वृत्तानुसार, काउंटरपॉइंट रिसर्चचे रिसर्च डायरेक्टर तरुण पाठक म्हणतात की टीसीएसचं हे पाऊल स्थूल आर्थिक दबाव, ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा आणि परिणाम-आधारित मॉडेलकडे वळणारी पावलं यामुळे आहे. ते म्हणाले, जरी टीसीएसनं या कर्मचारी कपातीचं वर्णन एआयमुळे असल्याचं केलं नसेल तरी, हे अशा वेळी घडत आहे जेव्हा ऑटोमेशन आणि एआयचा अवलंब तंत्रज्ञान उद्योगातील कर्मचाऱ्यांच्या निर्णयांवर मोठा परिणाम करत आहे. "भारतीय आयटी कंपन्या आता अधिक कार्यक्षम आणि कामगिरीवर केंद्रित वर्कफोर्स मॉडेलकडे वाटचाल करत आहेत," असंही ते म्हणाले.

सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत

आणखी कर्मचारी कपात होईल

उद्योगांना आता आयटी सेवा कंपन्या एआयचा वापर कमी करून अधिक काम करतील अशी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत, खर्चाच्या दबावामुळे आणखी नोकऱ्या कमी होतील. आपण याकडे आयटीमधील मोठ्या बदलांचा एक भाग म्हणून पाहिलं पाहिजे जिथे एआय एजंट्स मानवी एजंट्सची जागा वाढत्या प्रमाणात घेतील," अशी प्रतिक्रिया टेकआर्कचे संस्थापक आणि मुख्य विश्लेषक फैसल कावूसा यांनी दिली.

आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या चिंता वाढल्या

टीमलीज डिजिटलच्या सीईओ नीती शर्मा म्हणाल्या की, प्रत्येक कंपनी आता एआय-नेतृत्वाखालील परिवर्तनाकडे पाहत आहे. "कंपन्या त्यांच्या विद्यमान आणि नवीन कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. जे कर्मचारी कंपनीच्या भविष्यातील रचनेत बसत नाहीत किंवा त्यांच्या क्षमतांमध्ये सुधारणा करत नाहीत त्यांना काम सोडावं लागू शकतं," असं त्यांनी सांगितलं.

टीसीएसच्या या निर्णयामुळे आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत आणि सोशल मीडियावरही यावर व्यापक चर्चा होताना दिसत आहे. काही युजर्सनं एआय आणि ऑटोमेशनमुळे नोकरी जाण्याची भीती 'वास्तविकता' म्हणून वर्णन केली, तर काहींनी, यामुळे स्पर्धा वाढेल आणि पगार कमी होतील, अशी भीतीही व्यक्त केली.

टॅग्स :टाटानोकरी