नवी दिल्ली : भारतातील ५ पैकी ४ (८० टक्के) जण यंदा नवीन जॉब शोधण्याचा विचार करीत आहेत. मात्र, असे असताना अर्ध्याहून अधिक (५५ टक्के) अधिक जणांना गेल्या वर्षभरात रोजगार शोधण्याची प्रक्रिया अधिक आव्हानात्मक झाली असल्याचे वाटते. त्यामुळे तरुणांनी जॉबसाठी अर्ज करण्याच्या पद्धतीमध्ये आवश्यक ते बदल करणे गरजेचे असल्याचे जगातील सर्वांत मोठे प्रोफेशनल नेटवर्क लिंक्डइनच्या अहवालात म्हटले आहे.
नोकरी शोधणाऱ्यांना २०२४ मध्ये बाजारपेठेतील मंदीचा सामना करावा लागला. २०२५ ची सुरुवात झाली असताना २०२४ मध्ये नवीन नोकरीचा शोध घेत असलेले पाच पैकी चारजण नव्या संधी शोधत आहेत. नोकरीच्या संधी वाढतील व २०२५ मध्ये नोकरी मिळेल असा ५८ टक्के तरुणांना विश्वास असल्याचे अहवाल सांगतो.
अर्ज येताहेत अनेक पण...अनेकजण नोकरीसाठी अर्ज करत आहेत, मात्र त्यांना कंपन्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. हे प्रमाण ४९ टक्के इतके आहे. कंपन्यांनाही ही प्रक्रिया अधिक आव्हानात्मक वाटते आहे. २७ टक्के एचआर दिवसाला तीन ते पाच तास या अर्जांची छाननी करीत आहेत. मात्र, एकूण अर्जांपैकी केवळ अर्धे किंवा त्याहून कमी अर्ज निकषांची पूर्तता करीत असल्याचे एचआरचे मत आहे.रोजगार बाजारपेठ सध्या आव्हानात्मक आहे, पण यामधून भारतीयांना त्यांच्या नोकरी शोधण्याची पद्धत बदलण्याची गरज दिसून येते. योग्य कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. योग्य कौशल्ये आत्मसात केल्यास तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात, असे करिअर तज्ज्ञांनी म्हटले आहे.