Join us  

जनधन योजना बनली गरिबी निर्मूलनासाठी भक्कम पाया; योजनेला सहा वर्षे पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 6:22 AM

२०१४ साली पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी जनधन ही महत्त्वाकांक्षी योजना अमलात आणली होती.

नवी दिल्ली : जनधन योजना ही संपूर्ण चित्र पालटवणारी (गेम चेंजर) योजना ठरली आहे. देशामध्ये गरिबी निर्मूलनाच्या प्रयत्नांसाठी जनधन योजना भक्कम पाया बनली असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

जनधन योजनेला शुक्रवारी सहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, ज्यांची विशेषत: गरीब वर्गातील ज्या लोकांची बँकेमध्ये खाती नाहीत, त्यांची खाती उघडण्याच्या व त्यांना बँक व्यवहारांच्या कक्षेत आणण्याच्या उद्देशाने पंतप्रधान जनधन योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. या योजनेने पूर्वीचे सारे चित्रच पालटून टाकले. गरिबी निर्मूलनासाठी चाललेल्या प्रयत्नांना जनधन योजनेमुळे बळकटी मिळाली. त्याचा करोडो लोकांना फायदा झाला.

२०१४ साली पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी जनधन ही महत्त्वाकांक्षी योजना अमलात आणली होती. केंद्रातील भाजप सरकारच्या महत्त्वाच्या योजनांमध्ये ही योजना अग्रस्थानी आहे. नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, जनधन योजनेमुळे अनेक कुटुंबांचे भविष्य सुरक्षित झाले. या योजनेच्या लाभार्थींमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांची व महिलांची मोठी संख्या आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी झटलेल्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो.बँकेमध्ये उघडली ४० कोटी खातीपंंतप्रधान जनधन योजनेच्या प्रगतीसंदर्भातील ग्राफिकही नरेंद्र मोदी यांनी आपल्या टष्ट्वीटसोबत जोडले आहे. त्यातील माहितीनुसार देशात आतापर्यंत जनधन योजनेच्या अंतर्गत ४० कोटी बँक खाती उघडण्यात आली. या योजनेच्या लाभार्थींमध्ये ६३ टक्के लोक ग्रामीण भागातील आहेत. त्यात महिलांचे प्रमाण ५५ टक्के आहे. लाभार्थींना सरकारतर्फे मिळणारी मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करणे जनधन योजनेमुळे शक्य झाले आहे.

टॅग्स :नरेंद्र मोदी