RBI Balance Sheet : भारतीय रिझर्व्ह बँकेला देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य खांब मानला जातो. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने २०२४-२५ या आर्थिक वर्षात धमाकेदार कामगिरी केली आहे. आरबीआयने सोन्याच्या खरेदीत नवा विक्रम केला असून, केंद्राला दिलेल्या नफ्यातही विक्रमी वाढ झाली आहे. हे आकडे भारताच्या आर्थिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. नुकतेच भारतीय अर्थव्यवस्थेने जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकल्याची बातमी आली होती.
आरबीआयचा 'सुवर्ण' विक्रम!या आर्थिक वर्षात आरबीआयने ५७.५ टन नवीन सोने खरेदी केले आहे. यामुळे त्यांचा एकूण सोन्याचा साठा ८७९.५८ टन झाला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत ७% जास्त आहे. जागतिक अनिश्चितता आणि डॉलरच्या चढ-उतार लक्षात घेता, आरबीआय आता सोन्याला एक मजबूत राखीव मालमत्ता (Reserve Asset) म्हणून पाहत आहे. हा निर्णय भविष्यातील कोणत्याही आर्थिक संकटाचा सामना करण्यास भारताला अधिक बळ देईल.
आरबीआयच्या बॅलन्सशीटमध्ये मोठी वाढ, सरकारला 'बंपर' नफा!आरबीआयच्या आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा झाली आहे. त्यांचे एकूण उत्पन्न २२.८% ने वाढले आहे. एकूण ताळेबंदाचा आकार ८.२% ने वाढून ७६.२५ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, खर्चात फक्त ७.७६% वाढ झाली आहे.
याचा थेट परिणाम आरबीआयच्या नफ्यावर दिसून आला. आरबीआयने २०२४-२५ मध्ये सरकारला २.६९ लाख कोटी रुपयांचा विक्रमी अधिशेष (Surplus) दिला आहे. हा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत २७.३७% जास्त आहे. जर आरबीआयने आपल्या आपत्कालीन निधीत (Contingency Fund) काही पैसे बाजूला ठेवले नसते, तर हा नफा आणखी जास्त असता.
याचा अर्थ काय?सरकारला मिळालेला हा मोठा निधी वित्तीय तूट (Fiscal Deficit) कमी करण्यास मदत करेल. यामुळे सरकारला पायाभूत सुविधांवर अधिक खर्च करता येईल किंवा लोकाभिमुख योजनांसाठी निधी वापरता येईल, ज्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. आरबीआयच्या या धोरणांमुळे भारताची आर्थिक स्थिरता आणि रुपयाचे मूल्य मजबूत होण्यास मदत मिळते.
आरबीआयची एकूण मालमत्ता किती?आरबीआयचा एकूण ताळेबंद ८.२% ने वाढून ७०.४७ लाख कोटी रुपयांवरून ७६.२५ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ही आकडेवारी आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील आहे.
संपत्तीची विभागणी कशी आहे?देशांतर्गत मालमत्ता: एकूण मालमत्तेपैकी २५.७३% वाटा देशांतर्गत मालमत्तेचा आहे. मागील वर्षी हे प्रमाण २३.३१% होते.विदेशी मालमत्ता: परकीय चलन, सोने आणि इतर परदेशी गुंतवणुकीचा वाटा ७४.२७% आहे. मागील वर्षी हे प्रमाण ७६.६९% होते.
आरबीआयच्या ताज्या अहवालानुसार, सोन्याचे मूल्यांकन दररोज लंडन बुलियन मार्केट असोसिएशन (LBMA) च्या सोन्याच्या किमतीच्या ९०% आणि रुपया-डॉलर विनिमय दरावर आधारित असते. या मूल्यांकनातून होणारा नफा किंवा तोटा 'चलन आणि सोने पुनर्मूल्यांकन खात्यात' नोंदवला जातो.
वाचा - सोनं झालं स्वस्त! आज मोठी घसरण, खरेदीची 'सुवर्णसंधी' की अजून वाट पाहाल? नवे दर काय?
एकूण परकीय चलन साठा देखील ५.९५% ने वाढून ५७.१२ लाख कोटी रुपये झाला आहे. आरबीआयच्या या वाढत्या मालमत्तेमुळे भारताची आर्थिक स्थिरता अधिक मजबूत होत असल्याचे संकेत मिळतात.