Join us

"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 11:18 IST

Mehul Choksi News: फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीने लंडनच्या कोर्टात मोठा दावा केला आहे. २०२१ मध्ये भारतीय एजंट्सनं आपलं अपहरण केलं होतं, असा त्यानं म्हटलंय. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊ.

Mehul Choksi News: फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीने लंडनच्या कोर्टात मोठा दावा केला आहे. २०२१ मध्ये भारतीय एजंट्सनं आपलं अपहरण केलं होतं, असा त्यानं म्हटलंय. स्थानिक बँकांची फसवणूक करण्यासाठी राजकीय विरोधकांशी संगनमत केल्याची कबुली देण्यास भाग पाडल्याचा आरोपही चोक्सीने केला. चोक्सीवर दीड अब्ज डॉलर्सची फसवणूक केल्याचा आरोप आहे. गीतांजली जेम्स लिमिटेडचा चेअरमन मेहुल चोक्सी यानं भारत सरकार आणि अपहरणात सहभागी असलेल्या पाच जणांविरोधात लंडनच्या न्यायालयात खटला दाखल केलाय. 

भारत सरकारनं हे आरोप फेटाळून लावले आहेत. इंग्लंडच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी होऊ नये, असंही यावेळी सांगण्यात आलं. चोक्सी सध्या बेल्जियममध्ये आहे. तेथे भारताच्या फेडरल इन्व्हेस्टिगेटर्सच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीनंतर एप्रिलमध्ये त्याला अटक करण्यात आली होती. आपलं प्रत्यार्पण होऊ नये म्हणून चोक्सीनं लंडनमध्ये हे आरोप केल्याचं एका सरकारी वकिलानं न्यायालयाला सांगितलं. तसेच २,५०,००० पौंडांचाही (३,३९,६९० डॉलर) दावा त्यानं केलाय.

 

Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?

२०१८ मध्ये झालेला फरार

मेहुल चोक्सी ६६ वर्षांचा आहे. त्याचा पुतण्या नीरव मोदी ५४ वर्षांचा आहे. दोघेही २०१८ मध्ये भारतातून पळून गेले. पीएनबीमध्ये फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. नीरव मोदी आणि चोक्सी हे हिरे उद्योगाशी संबंधित फसवणूक प्रकरणांमध्ये सर्वात मोठे आरोपी होते. भारत जगातील सुमारे ९०% हिरे कट आणि पॉलिश करतो. नीरव मोदी अजूनही यूकेच्या तुरुंगात आहे. तो आधीच त्याचा प्रत्यार्पण खटला हरलाय. चोक्सी अँटिग्वामध्ये राहत होता. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्यावर भारतात लाचखोरी, फसवणूक आणि मनी लाँड्रिंगशी संबंधित आरोप आहेत. दोघांनीही यापूर्वी फसवणुकीत सहभाग नाकारलाय.

वकिलांचा मोठा दावा

चोक्सीच्या वकिलांचं म्हणणं आहे की त्याचं मे २०२१ मध्ये अँटिग्वा येथील त्याच्या घराजवळून अपहरण करण्यात आलं होतं. 'त्याला बेदम मारहाण करण्यात आली, ज्यामध्ये मुक्का मारण्यात आला, चेहऱ्यावर टेसर गनने हल्ला करण्यात आला, डोळे बांधण्यात आले, व्हीलचेअरला बांधण्यात आले आणि गळा दाबण्यात आला. तो बेशुद्ध पडला,' असं चोक्सीचे वकील एडवर्ड फिट्झगेराल्ड यांनी न्यायालयाला सांगितलं. जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तो एका बोटीवर होता. तिथे त्याला पुन्हा मारहाण करण्यात आली आणि धमकी देण्यात आली की जर तो भारतात परतण्यास तयार झाला नाही तर त्याला आणि त्याच्या कुटुंबाला मारलं जाईल, असाही दावा त्याच्या वकिलानं केलाय.

भारत सरकारचं म्हणणं आहे की चोक्सीचे आरोप खोटे आहेत. चोक्सी हे आरोप भारतातून त्याचं प्रत्यार्पण रोखण्यासाठी करत आहे. हे कथित गुन्हे ब्रिटनमध्ये घडलेले नाहीत, त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी ब्रिटनमध्ये होऊ नये, असं सरकारचं म्हणणं आहे.

टॅग्स :पंजाब नॅशनल बँक घोटाळालंडन