Join us

बेरोजगार तरुणांचे फुलशेतीतून पालटले नशीब, आता वर्षाला होतेय 5-6 लाखांची कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 17:00 IST

हमीरपूरमध्ये साडेसात हेक्टर जमिनीवर फुलांची लागवड करण्यात येत असल्याचे फलोत्पादन विभागाकडून सांगण्यात आले. यातून येथील सुमारे 30 शेतकरी आपला उदरनिर्वाह करत आहेत.

शेतीच्या माध्यमातून अनेक तरुण आपले नशीब बदलत आहेत. हिमाचल प्रदेशातूनही असेच चित्र समोर येत आहे. येथील हमीरपूर जिल्ह्यातील करडी गावातील काही लोक फुलशेतीतून भरघोस नफा कमवत आहेत. त्यामुळे त्यांना वर्षाला 5 ते 6 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. हमीरपूरमध्ये साडेसात हेक्टर जमिनीवर फुलांची लागवड करण्यात येत असल्याचे फलोत्पादन विभागाकडून सांगण्यात आले. यातून येथील सुमारे 30 शेतकरी आपला उदरनिर्वाह करत आहेत.

करडी गावातील शेतकरी विशाल सिंह यांनी सांगितले की, "मी पूर्वी चंदीगडमध्ये पेट्रोल पंपावर काम करत होते. यादरम्यान मला 12 ते 15 हजार रुपये मिळत होते. एवढ्या कमी पगारात घर चालवणे कठीण जात होते. मला सुरुवातीपासूनच फुलांची ओढ होती. खूप विचार केल्यानंतर मला फलोत्पादन विभागाकडून फुलांच्या उत्पादनाची माहिती मिळाली. यानंतर 4 पॉलिहाऊसमध्ये फुलांची लागवड सुरू केली. त्यामुळे मला वर्षाला 5 ते 6 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे." 

याच गावातील आणखी एक शेतकरी करनैल सिंह यांनीही फुलांच्या शेतीबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, "मी पूर्वी बेरोजगार होतो. फलोत्पादन विभाग नादौनमधून फुलशेतीची माहिती मिळाली. अनुदानावर 4 पॉलीहाऊस उभारले. कापनेशन आणि झेंडूच्या फुलांची लागवड सुरू केली." दरम्यान, आता करनैल सिंह सुद्धा फुलशेतीतून वर्षाला 5 ते 6 लाख रुपये कमावत आहेत. याशिवाय, शेतकरी विशाल सिंहची आई कौशल्या देवी यांनी सांगितले की, त्या आपल्या मुलाला फुलांची लागवड करण्यापासून रोखत होती. मात्र, आता त्यांचा मुलगा फुलशेतीतून भरपूर कमाई करत आहे. उत्पन्नात सातत्याने होणारी वाढ पाहून त्याला खूप आनंद होतो.

विशाल आणि करनैल सिंह यांना आपल्याकडून फुलांच्या उत्पादनाची माहिती मिळाली, त्यामुळे त्यांना आजही चांगले उत्पन्न मिळत आहे, असे नादौन फलोत्पादन विभागाच्या कृषी अधिकारी निशा मेहरा यांनी सांगितले. तसेच इतर बेरोजगार युवकांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. फलोत्पादन विभाग शेतकर्‍यांना पॉलीहाऊसवर अनुदानही देते. याशिवाय, फुलांच्या पॅकिंगसाठी सरकारकडून पॅकहाऊसही बांधले जात आहे, असे निशा मेहरा यांनी सांगितले.

टॅग्स :व्यवसाय