Join us

वाहन उद्योगात पेट्रोल-डिझेलऐवजी पर्यावरणपूरक हायड्रोजन व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 03:43 IST

टोयोटा-किर्लोस्करचे उपव्यवस्थापकीय संचालक राजू केटकाळे यांचे मत

कोल्हापूर : पर्यावरणपूरक आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जगभरातील मोटार उद्योग कात टाकत असून, ऊर्जा सुरक्षा आणि प्रदूषणाच्या समस्यांवर उत्तर म्हणून हायड्रोजन तंत्राचा (हायड्रोजन फ्युएल सेल्फ टेक्नॉलॉजी) वापर असलेली वाहने रस्त्यांवर धावताना दिसतील, याची सुरुवात आता झाली आहे, असे मत टोयोटा-किर्लोस्कर मोटारचे उपव्यवस्थापकीय संचालक राजू केटकाळे यांनी मांडले.

‘मोटार उद्योग व आर्थिक मंदी’ या विषयावर राजू केटकाळे यांच्याशी बुधवारी पत्रकारांनी कोल्हापुरात संवाद साधला. केटकाळे हे कोल्हापूर जिल्ह्यातील कबनूर येथील रहिवासी असून, गेली २० वर्षे ज्या पदावर जपानी व्यक्ती असायच्या, त्या पदावर भारतीय, विशेषत: कोल्हापूरच्या व्यक्तीला प्रथमच संधी मिळाली आहे. मोटार उद्योग, अभियांत्रिकी अभ्यासक्रम व करिअरच्या संधी यावर त्यांनी मत मांडले. १० वर्षांत इलेक्ट्रोफिकेशन व हायब्रिडवर आधारित मोटारी बाजारात असतील. इलेक्ट्रोफिकेशन, बॅटरी आॅपरेटेड व्हेइकल, फ्युएल आॅपरेटेड व्हेइकल आणि हायब्रीड या चार प्रकारांत मोटार उद्योगांचा पाया आहे, असे ते म्हणाले.आर्थिक मंदीला तोंड देण्यास भारत सक्षमआर्थिक मंदीची झळ या क्षेत्रालाही बसली आहे, तरी जगाच्या तुलनेत भारतात मोटरायझेशनची सुरुवात आता झाली आहे. वाहनविषयक धोरणात मूलत: बदल करण्याची तयारी भारत करीत आहे. या खात्याचे मंत्री नितीन गडकरी हे त्यासाठी आग्रही आहेत, असे मतही केटकाळे यांनी व्यक्त केले. भविष्यात आयसी इंजिन कालबाह्य होईल, ही भीती अनाठायी आहे. फाउंड्री आणि स्टील उद्योगाला मरण नाही. यात चीनपेक्षाही भारत सध्या आघाडीवर आहे. आर्थिक मंदीला भारत सक्षमपणे तोंड देत आहे, हे वास्तव आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :टाटाव्यवसायपेट्रोल