Join us  

धनत्रयोदशीला उत्साह, सुवर्ण खरेदी ४०० कोटींवर!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 7:06 AM

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी सोमवारी सराफ बाजारात गर्दी झाली होती. राज्यात सुमारे ४०० कोटींहून अधिक उलाढाल झाली.

मुंबई - धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी सोमवारी सराफ बाजारात गर्दी झाली होती. राज्यात सुमारे ४०० कोटींहून अधिक उलाढाल झाली. सोन्याचे दर प्रति तोळा ३२ हजार ८०० रुपयांवर गेल्यानंतरही ग्राहकांनी खरेदीला पसंती दिल्याचे मुंबईत झवेरी बाजारासह इतर सराफ पेढ्यांवर दिसले. कोसळणारा शेअर बाजार आणि लग्नसराईच्या मुुहूर्ताची जोड मिळाल्याने सोने खरेदीत तेजी असल्याचे मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी सांगितले.जैन म्हणाले की, गेल्या ८ वर्षांत सोन्यात गुंतवणूक केलेल्या ग्राहकांना तब्बल ७० टक्के परतावा मिळालेला आहे. त्या तुलनेत शेअर बाजारात मिळालेला परतावा केवळ १४ टक्के इतकाच आहे.ग्राहक उत्सवाच्या काळात फक्त सवलतींकडे बघत नसून गुणवत्ता, डिझाइन, ब्रँडचा वारसा, विश्वासार्हता, घडणावळ, प्रमाणीकरण, विक्रीपश्चात सेवा या गोष्टींचा विचार करत असल्याची माहिती इंडियन बुलियन अ‍ॅण्ड ज्वेलरी असोसिएशनचे (आयबीजेए) संचालक सौरभ गाडगीळ यांनी दिली. ते म्हणाले की, ग्राहक हे प्रत्यक्ष किंवा ई-गोल्ड अशा दोन्ही प्रकारांत गुंतवणूक करताना दिसत आहेत. त्यांना गोल्ड बॉण्ड किंवा ई-गोल्ड हे पर्याय म्हणून स्वीकारायला अजून थोडा वेळ लागेल.डायमंड ज्वेलरीला पसंती!ग्राहकांची पसंती डायमंड ज्वेलरीला अधिक दिसत आहे. यावर्षी मागणीत सुमारे २५ टक्के वाढ झाली आहे. ब्रँडेड डायमंड ज्वेलरीला मिळणाऱ्या बायबॅक गॅरंटीमुळे ग्राहकांचा कल त्याकडे अधिक आहे.- सौरभ गाडगीळ, संचालक-इंडियन बुलियन अ‍ॅण्ड ज्वेलरी असोसिएशन.

टॅग्स :दिवाळीसोनं