Join us  

११८ मोबाईल अ‍ॅपवर घातलेली बंदी मागे घ्यावी, चीनने केली भारताकडे आग्रही मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 6:04 AM

चीनने बनविलेल्या ११८ मोबाईल अ‍ॅपवर बंदी घालण्याचा चुकीचा निर्णय भारताने रद्द करावा, असे त्या देशाला कळविण्यात आले आहे. पबजी हा व्हिडिओ गेम असलेले अ‍ॅप भारत तसेच जगात अनेक ठिकाणी लोकप्रिय आहे.

बीजिंग : पबजीसह ११८ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याच्या भारताने घेतलेल्या निर्णयाचा चीनने जोरदार निषेध केला आहे. चिनी गुंतवणूकदारांच्या न्याय्य हक्कांवर भारताच्या निर्णयामुळे गदा आली असल्याची टीका चीनने केली आहे.यासंदर्भात चीनच्या वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ते गाओ फेंग यांनी सांगितले की, चीनने बनविलेल्या ११८ मोबाईल अ‍ॅपवर बंदी घालण्याचा चुकीचा निर्णय भारताने रद्द करावा, असे त्या देशाला कळविण्यात आले आहे. पबजी हा व्हिडिओ गेम असलेले अ‍ॅप भारत तसेच जगात अनेक ठिकाणी लोकप्रिय आहे. त्यातून चिनी उत्पादकांना महसूलही चांगला मिळतो. भारतामधील डेटाची चोरी होण्याची शक्यता लक्षात घेऊन या अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले. बंदी घातलेल्या मोबाईल अ‍ॅपपैकी पबजीचे भारतात ५ कोटी वापरकर्ते होते. याआधीही भारताने चिनी बनावटीच्या ५९ अ‍ॅपवर बंदी घातली होती.चीनवर दबाव टाकण्यासाठी पावलेभारतीय स्टार्ट अप कंपन्यांनी विविध अ‍ॅप विकसित करावीत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केले होते. विविध सरकारी प्रकल्पांची कामे चिनी कंपन्यांना न देण्याचे धोरण केंद्र सरकारने अवलंबले आहे.त्यामुळे रेल्वे खात्याशी संबंधित काही कामांची कंत्राटे चिनी कंपन्यांना मिळण्याची शक्यता दिसल्यावर संपूर्ण निविदा प्रक्रियाच रद्द करण्यात आली होती. अशा प्रकारे केंद्र सरकार एक- एक पाऊल पुढे टाकत चीनवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे.

टॅग्स :व्यवसायभारतचीन