Join us  

कपड्यांची मिल चालवणारा असा बनला 'Wind Energy' चा बादशाह; वाचा सुझलॉनचा प्रेरणादायी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 2:29 PM

आयुष्यात संघर्ष केला तर यश पदरी पडतंच. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अनेकजण धडपड करत असतात. आज आपण अशाच एका उद्योजकाचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया भारताचे विंड मॅन म्हणून ओळख असलेले तुलसी तांती यांचा संघर्षमय कहाणी...

Success Story : जवळपास ३० वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. सुरूवातीच्या काळात तुलसी तांती सुरतमध्ये एक मिल चालवत असत. हा असा काळ होता ज्यावेळी भारतात वीजेचा मोठा तुटवडा असायचा. काही ठिकणी अख्खी  गावं अक्षरश: अंधारात असायची. त्यावेळचे व्यवसायिक उद्योगधंद्यासाठी जनरेटरचा उपयोग करायचे. अशा परिस्थितीत तुलसी तांती यांच्या डोक्यात काहीतरी भन्नाट शिजत होतं. आपल्या फॅक्टरीमध्ये वीजेची पूर्तता करण्यासाठी त्यांनी दोन विंड टर्बाइन आपल्या कंपनीमध्ये जोडले. त्यांच्या या कृतीने मोठा बदल घडून आला. शिवाय त्यानंतर 'विंड मॅन ऑफ इंडिया' या नावाने ते प्रसिद्ध झाले. पवनचक्कीच्या साहाय्याने तुलसी तांती यांनी वीजनिर्मिती क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली. सध्याच्या घडीला त्यांच्या सुझलॉन कंपनीची गणना भारतातील सर्वात मोठ्या विंड एनर्जी कंपनीमध्ये केली जाते. 

सुझलॉन कंपनीचे संस्थापक तुलसी तांती यांनी जरी जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या कार्यातून ते नेहमीच प्रत्येकाच्या स्मरणात आहेत. भारतात पवन ऊर्जा व्यवसायाला चालना देणारं व्यक्तिमत्व अशी त्यांची जगभर ख्याती आहे. तांती यांनी साधारणत: १९९५ मध्ये पवन ऊर्जेची कल्पना पहिल्यांदा जगसमोर मांडली. त्या वेळेस व्यवसाय क्षेत्रात विदेशी कंपन्यांचा मोठा दबदबा होता. तुलसी तांती यांच्या प्रोफेशनबद्दल सांगायचं झालं तर ते ते एक उत्तम इंजिनिअर होते. 

अशी उभारली कंपनी -

वीजनिर्मिती क्षेत्रात काहीतरी उत्तम करण्याची त्यांना प्रबळ इच्छा होती. आपल्या कारखान्यात पवन ऊर्जेचा असा अनोखा प्रयोग करत त्यांनी याचं महत्त्व ओळखलं. त्यानंतर त्यांनी पुणे गाठलं आणि तेथे राहणाऱ्या आपल्या भावाला त्यांची कल्पना सांगितली.  त्यांच्या भावाला देखील ही कल्पना प्रचंड आवडली. त्यानंतर कशी-बशी जमवाजमव करत त्यांनी १.५ कोटी रूपये जमा केले आणि सुझलॉनची स्थापना केली. तुलसी तांती यांनी वीजनिर्मिती क्षेत्रात आपलं योगदान देऊन लोकांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला. 

२००५ मध्ये शेअर मार्केटमध्ये लिस्ट- 

कालांतराने शेअर बाजारात सुझलॉन कंपनी लिस्ट झाली. कंपनीने मधून १५०० कोटी इतकी रक्कम उभी केली. त्यानंतर कंपनीच्या शेअर्सची किंमत १३,६७९ कोटींवर पोहचली. अवघ्या काही वर्षातच  कंपनी भारतातील आणि जगातील चौथी सर्वात मोठी पवन ऊर्जा कंपनी बनली. 

सुझलॉन कंपनीच्या शेअरने मार्केटमध्ये उच्चांकी गाठायला सुरूवात केली. त्यातच कंपनीचे जर्मन कंपनी आरई पॉवर या कंपनीसोबत विलीनीकरण करण्यात आलं. या विलीनीकरणाचा फटका सुझलॉनला चांगलाच बसला.

विलीनीकरणामुळे आले बुरे दिन- 

सेन्व्हियनच्या खराब पार्ट्समुळे सुझलॉनला त्याचा भूर्दंड आला. कंपनीला ४११ कोटींचा दंड भरावा लागला. यामुळे २०१० मध्ये कंपनी पहिल्यांदा तोट्यात गेली. या प्रकारामुळे सुझलॉन कंपनी पुरती कर्जात बुडाली. २०१४ पर्यंत कंपनीवर १७,८१०.९६ कोटी इतकं कर्ज झालं. 

तुलसी तांतींनी दिला ढासळत्या कंपनीला आधार- 

कंपनीचा ढासळता कारभार पाहूनही तुलसी तांती यांनी हार मानली नाही. कंपनीच्या आर्थिक स्थिती  सुधारावी याकरिता त्यांनी मोठं पाऊल उचललं. सेन्व्हियनचा त्यांनी लिलाव केला आणि २०१५ मध्ये तांती यांनी सन फार्मा कंपनीचे मालक दिलीप सांघवी यांच्याकडून  ४०० कोटी रुपयांच कर्ज घेतलं. हळूहळू सुझलॉनची आर्थिक स्थिती सुधारली. सध्या सुझलॉनची इन्स्टॉल विंड कॅपॅसिटी २०.५ गिगावॅट इतकी आहे. तसेच कंपनीकडे ३२ टक्के मार्केट शेअर असल्याचं सांगितलं जातं.

टॅग्स :व्यवसायप्रेरणादायक गोष्टीपानचक्की