Join us  

अनिल अंबानींना मोठा झटका! SBI ने तीन बँक खाती ठरवली 'फ्रॉड'; CBI चौकशी होणार?

By मोरेश्वर येरम | Published: January 07, 2021 12:18 PM

एसबीआयच्या या निर्णयामुळे अनिक अंबानी यांना आगामी काळात मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.

ठळक मुद्देउद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणींत वाढस्टेट बँकेतील तीन खाती ठरविण्यात आली फ्रॉडअनिल अंबानींना सीबीआय चौकशीला सामोरं जावं लागणार?

नवी दिल्लीरिलायन्स कम्युनिकेशन, रिलायन्स टेलिकॉम आणि रिलायन्स इन्फ्राटेल या तीन कंपन्यांची बँक खाती 'फ्रॉड खाती' म्हणून घोषीत करण्यात आल्याची माहिती 'स्टेट बँक ऑफ इंडिया'ने (SBI) दिल्ली उच्च न्यायालयात दिली आहे. या तिन्ही कंपन्यांची मालकी उद्योगपती अनिल अंबानी यांच्याकडे आहे. 

'एसबीआय'चा निर्णय अनील अंबानी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. अनिल अंबानींच्या तीन कंपन्यांच्या बँक खात्यांचे ऑडिट केले असता त्यात निधीचा दुरुपयोग, चुकीच्या पद्धतीने हस्तांतरण आणि अफरा-तफरी झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच तिन्ही खात्यांना 'फ्रॉड' यादीत टाकण्यात आलं आहे, असं बँकेने कोर्टात नमूद केलं आहे.

अनिल अंबानींसमोर अडचणीएसबीआयच्या या निर्णयामुळे अनिक अंबानी यांना आगामी काळात मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. कारण एसबीआयकडून या प्रकरणासाठी फसवणुकीच्या आरोपाखाली कोर्टात सीबीआय चौकशीची मागणी केली जाऊ शकते. 

एखाद्या कंपनीचं बँक खातं हे फ्रॉड खातं तेव्हाच घोषीत केलं जातं जेव्हा ते अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) खातं होतं. नियमानुसार फ्रॉड खातं जाहीर झाल्याच्या याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देणं गरजेचं असतं. जर त्या खात्यातून झालेली फसवणूक ही १ कोटींपेक्षा अधिक रकमेची असेल तर 'आरबीआय'ने सूचना दिल्याच्या ३० दिवासांच्या आत त्याबाबत सीबीआयकडे गुन्ह्याची नोंद करण्यात येते. 

सुत्रांच्या माहितीनुसार अनिल अंबानी यांच्या तिन्ही कंपन्यांची स्टेट बँकेकडे ४९ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात रिलायन्स इन्फ्राटेलच्या १२ हजार कोटींच्या थकबाकीचा समावेश आहे. तर रिलायन्स टेलिकॉमने २४ हजार कोटी थकवले आहेत.  

टॅग्स :अनिल अंबानीरिलायन्सरिलायन्स कम्युनिकेशनबँकएसबीआय