नवी दिल्ली : स्टार्टअप कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या सरकारने नियम शिथिल केले आहेत. तसेच १0 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी येथे एका समारंभात देशभरातील तरुण उद्योजकांशी संवाद साधला. डेहराडून, गुवाहाटी आणि रायपूर यासारख्या छोट्या शहरांतील उद्योजकही या कार्यक्रमात सहभागी होते. मोदी यांनी सांगितले की, स्टार्टअप उद्योग आता मोठ्या शहरांपुरता मर्यादित राहिलेला नाही. छोट्या शहरांतही त्याचा विस्तार होत आहे.स्टार्टअपसाठी मेक इन इंडिया आणि डिझाईन इन इंडिया यासारखे सरकारचे उपक्रम महत्त्वाचे आहेत. पूर्वी डिजिटल आणि तंत्रज्ञान क्षेत्रापुरतेच स्टार्टअप मर्यादित होते. आता शेतीसारख्या क्षेत्रातही त्याचा शिरकाव झाला आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.या आहेत सवलतीमोदी यांनी म्हटले की, आम्ही स्टार्टअप इंडिया अॅक्शन प्लॅन सुरू केला आहे. उद्योगांना कर सवलत देणे, इन्स्पेक्टर राज संपविणे, भांडवली लाभ करातून सूट देणे यासारख्या सवलती देण्याचा उद्देश त्यामागे आहे. स्टार्टअप उद्योगांना अर्थसाह्य करण्यासाठी सरकारने १0 हजार कोटींचा निधी निर्माण केला आहे. स्टार्टअप कंपन्या आपली उत्पादने सरकारला विकू शकतात. त्यासाठी सार्वजनिक संपादनाचे नियम शिथिल करण्यात आले आहेत.
‘स्टार्टअप’ योजनेस केंद्राचे १0 हजार कोटी - पंतप्रधान नरेंद्र मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:30 IST