RBI Repo Rate : जर तुम्ही या सणासुदीच्या दिवसांत कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच तुम्हाला एक मोठी भेट देऊ शकते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका अहवालानुसार, ४ ते ६ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात करण्याची घोषणा केली जाऊ शकते.
रक्षाबंधनपूर्वी 'दिवाळी' येणार!एसबीआयच्या अहवालात म्हटले आहे की, ऑगस्टमध्ये व्याजदरात कपात झाल्यामुळे सणासुदीच्या काळात कर्जाची मागणी वाढेल आणि यामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीला चालना मिळेल. याला त्यांनी 'लवकर दिवाळी' येण्यासारखं म्हटलं आहे. मागील आकडेवारीनुसार, दिवाळीपूर्वी रेपो दर कमी केल्याने सणासुदीच्या काळात कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होते, असे दिसून आले आहे.
कमी रेपो दराचा तुम्हाला काय फायदा?रेपो दर कमी झाल्यामुळे बँकांचा रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेण्याचा खर्च कमी होतो. यामुळे बँका सामान्य ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देऊ शकतात.
- गृहकर्ज : गृहकर्जाचे दर थेट रेपो दराशी जोडलेले असल्यामुळे, रेपो दर कमी झाल्यास तुमचे गृहकर्ज स्वस्त होईल आणि तुमच्या EMI वरही सकारात्मक परिणाम होईल.
- इतर कर्जे: कार लोन, पर्सनल लोन यांसारख्या कर्जांचे व्याजदरही कमी होऊ शकतात.
- अर्थव्यवस्थेला चालना: कमी व्याजदरामुळे लोक घरे आणि गाड्या खरेदी करण्यासाठी कर्ज घेतात. यामुळे बाजारात पैशांचा प्रवाह वाढतो आणि देशाच्या आर्थिक विकासालाही चालना मिळते.
वाचा - महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
आतापर्यंत तीन वेळा दर कपात२०२५ मध्ये आरबीआयने आतापर्यंत रेपो दरात तीन वेळा कपात केली आहे. फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये २५-२५ बेसिस पॉइंट्सची कपात केली होती, तर जूनमध्ये त्यात ५० बेसिस पॉइंट्सची मोठी कपात करून तो ६% वरून ५.५०% वर आणला होता. आता ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा कपात झाली, तर तो ५.२५% पर्यंत खाली येऊ शकतो. यामुळे कर्ज घेणाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा असेल.