Gangapur Dam : दोन दिवसांपासून गंगापूर धरण (Gangapur Dam) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने गंगापूर धरणात एकाच दिवसात तब्बल १२ टक्के वाढ झाली आहे. आज २० जून रोजी धरण जवळपास ६५ टक्के भरले आहे. मागील वर्षी याच दिवशी हाच साठा केवळ १७.३४ टक्के इतका होता. त्यामुळे आज सकाळपासून धरणातून ११६० क्युसेकने विसर्ग सुरु आहे.
सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने (Monsoon rain) जिल्ह्याला झोडपले आहे. यामुळे अनेक नद्या- नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आले असून, काही धरणे भरल्यामुळे त्यांच्यातून विसर्ग सुरू झाला आहे. या पावसामुळे अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गंगापूर धरण (Gangapur Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असून, धरण ६५.३८ टक्के भरले. आवक सातत्याने सुरूच असल्याने धरणातून विसर्ग ११६० क्युसेकने सोडण्यात आला आहे. परिणामी यंदाच्या हंगामातील पहिलाच पूर आला आहे. पुढील कालावधीत धरणामधील आवक बघून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवावा लागणार आहे.
२४ तासात इतका पाऊस झाला गंगापूर धरण समूह परिसरात पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. जून महिन्यात पहिल्याच पावसात ६५ टक्केपेक्षा अधिक साठा झाल्याने गंगापूर धरणातूनही विसर्ग सुरु आहे. पेठ तालुक्यात सर्वाधिक १२२, त्र्यंबक ११७, सुरगाणा १०१, इगतपुरी ७२, दिंडोरी ६९, बागलाण ४५, नाशिक ४५, कळवण ३४, निफाड ३१, सिन्नर २६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून ९४६५ क्युसेक विसर्ग सुरू आहे.