भंडारा : पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीपूरक व्यवसायाची साथ मिळाली तर शेती हा उत्तम व्यवसाय निर्माण होऊन त्यातून शेतकरी स्वतःचे जीवनमान नक्कीच उंचावू शकतो. भंडारा जिल्ह्यातील (Bhandara District) लाखनी तालुक्यातील केसलवाडा (राघोर्ते) येथील उत्तम हरिश्चंद्र टांगले हे शेतकरी पोल्ट्री फार्म (Poultry Farming) व्यवसायातून चांगला नफा मिळवत आहेत.
उत्तम हरिश्चंद्र टांगले (४६) हे केसलवाडा (राघोर्ते) या लहानशा गावचे रहिवासी. शेती हा मुख्य व्यवसाय. परंतु पारंपरिक शेतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत नव्हता. याचसाठी शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन (Poultry Business) व्यवसाय करण्याचे ठरवले. शेतीला पूरक म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय पाच वर्षापूर्वी सुरू केला. त्यातून त्यांना दर वर्षाला जवळपास ९ लाखांचे उत्पन्न प्राप्त होत असून, शेतकऱ्यांसाठी ते प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरत आहेत.
बेरोजगारांना दिले कामहरिश्चंद्र टांगले वर्षभर दोन मजुरांना आणि हंगामी सहा ते सात मजुरांना काम देतात. तसेच त्यांनी आजपर्यंत परिसरातील जवळपास सात शेतकऱ्यांना कुक्कुटपालन व्यवसायाविषयी मार्गदर्शन केले आहे. स्वतःच्या बेरोजगारीवर मात करीत बेरोजगारांनाही त्यांनी काम दिले आहे.
वाढत गेला नफाशेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन करण्याचे ठरवले. केंद्र शासनाच्या वतीने देण्यात येणारे स्टार प्रशिक्षण केंद्र भंडारा येथून कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण घेतले. त्याचे त्यांना प्रमाणपत्र मिळाले. टांगले यांनी शासकीय योजनेतून बँकेद्वारे १० लाखांचे ५ वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज घेतले.
स्वतःच्या शेतामध्ये ३० बाय १५० चौरस फूट आकाराचा शेड तयार केला. शेतात पाण्याची, विजेची व रस्त्याची व्यवस्था केली. नागपूर येथील एका पोल्ट्री कंपनीशी संपर्क साधून करार केला. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगनुसार कंपनी त्यांना पिल्लू, अन्न औषधी देतात.
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीतून बाहेर पडून शेतीपूरक व्यवसाय केला पाहिजे. आपली कार्यक्षमता वाढली तर प्रगती होते. शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे वळावे. - उत्तम टांगले, शेतकरी, केसलवाडा (राघोर्ते)