Join us

पुण्यात सॉफ्टवेअर व्यावसायिक असलेल्या तरुणीने आपल्या शेतात एआयचा स्मार्ट वापर कसा केला?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 3:31 PM

पुण्यातील सॉफ्टवेअर व्यवसायिक असलेल्या तरुणीने गावाकडील आपल्या शेतीत एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेचा प्रयोग करून जैवविविधता कशी वाढवली? जाणून घ्या प्रयोगाबद्दल

कूर्ग...! कर्नाटक राज्यातील एक जिल्हा. ज्याला कोडागु म्हणूनही ओळखलं जातं. समृद्ध जैवविविधतेसाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे. नव्याने शेतीत येऊ घातलेल्यांसाठी हा भूभाग नव्या संधी आणि आव्हाने घेऊन उभाच असतो. मुसळधार पाऊस आणि उष्णकटिबंधीय प्रदेश असलेल्या या जिल्ह्यात हवामानाचे बदलते स्वरूप पाहायला मिळते. 

पारंपारिक कॉफी मळ्यांच्या पद्धतींमध्ये झालेल्या बदलांमुळे येथे दुष्काळ, पूर, चक्रीवादळ अशा नैसर्गिक संकटांमध्येही वाढ झालीये. देशी झाडांऐवजी विदेशी झाडांची भरमसाठ लागवड झाल्याने येथील जैवविविधता धोक्यात आली असून  स्थानिक झाडांच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. नैसर्गिक संकटांमुळे येथील पायाभूत सुविधांचे नुकसान होत असल्याने शेतीमधील यशाची निश्चितता दिवसेंदिवस धूसर होत आहे. याच बदलत्या आणि अनिश्चित असलेल्या कृषी पद्धतीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी एका शेतकऱ्याच्या मुलीने कंबर कसली आहे. प्रिया मोटाना असं तिचं नाव.

प्रिया या एक शेतकरी आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरही आहेत. सध्या व्यवसायानिमित्त त्या पुण्यात राहत असल्या तरी शेतीकडेही त्यांचे लक्ष असते.  कूर्गमधील त्यांच्या कॉफीच्या मळ्यात वापरलेले आधुनिक तंत्रज्ञान इतर शेतकऱ्यांच्याही बांधापर्यंत पोहोचावे असा त्यांचा मानस आहे. त्यांचा अनुभव इतर शेतकऱ्यांना नक्कीच फायद्याचा ठरेल असा त्यांचा विश्वास आहे. 

कूर्ग जिल्ह्यातील सोमवारपेट तालुक्यातील वलगुंडा गावात प्रिया यांचा  ४० एकरावर कॉफीचा मळा आहे. त्यांनी शेतकऱ्यांसमोर असलेली सद्यस्थितीतील आव्हाने प्रत्यक्षपणे समजावून घेतलेली आहेत. शेतीची आवडच त्यांना पारंपरिक शेतीत कायापालट करण्यास कारणीभूत ठरली. परिणामी त्यांच्या पारंपारिक उत्पादनात भरघोस वाढली झाली आणि गुणवत्ताही सुधारली. यासाठी प्रिया यांनी आपल्या पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली आहे.

स्मार्ट प्रणालीचा वापरदिवसेंदिवस बदलत असलेल्या हवामानामुळे पिके आणि पायाभूत सुविधांना मोठा धोका निर्माण झाला आहे. म्हणून त्यांनी सगळ्यात सुरूवातील आपल्या शेतात वेदर स्टेशन म्हणजेच प्रगत हवामान निरीक्षण प्रणाली लागू करून यावर मात केली. AI आणि डेटा ॲनालिटिक्स एकत्रित करून त्या हवामानाच्या नमुन्यांचा अचूक अंदाज लावू शकतात, ज्यामुळे भविष्यातील धोक्यावर नियंत्रण ठेवता येते.

पाणी व्यवस्थापनही स्मार्टज्या परिसरात प्रिया यांचे कॉफीचे मळे होते त्या परिसरामध्ये उन्हाळ्यात दुष्काळ आणि पावसाळ्यामध्ये पूर अशा दोन नैसर्गिक संकटाच्या बाजू पाहायला मिळायच्या. यावर त्यांनी कायमस्वरूपी तोडगा काढला आणि मातीतील आर्द्रता सेन्सर आणि स्वयंचलित पाणी वितरणासह सुसज्ज स्मार्ट सिंचन प्रणाली लागू केली. या माध्यमातून पिकांना हवे तेवढे आणि सर्व पिकांना सारखे पाणी दिले जाते. यामुळे पाण्याची आणि वेळेची बचत झाल्याचं त्या सांगतात. 

गुणवत्ता नियंत्रण असे केलेकृषी व्यवसाय करत असताना उत्पादनाची गुणवत्ता राखून ठेवणे अत्यंत गरजेचे असते. पीक आरोग्य आणि मातीचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्यासाठी उपग्रह आणि ड्रोनचा वापर करून शेतीचे हाय-रिझोल्यूशन फोटो काढले जातात. ज्यामुळे पीक आरोग्य, मातीची आर्द्रता यांचे अचूक मॅपिंग शक्य होते. यामुळे पिकांवरील संभाव्य रोग ओळखणे, रोगावर नियंत्रण, खते नियोजन, सिंचन आणि कीटक नियंत्रणासाठी फायद्याचा ठरतो.

इंधनावरील अवलंबित्व कमीकॉफी बीन्स सुकविण्यासाठी इंधनावर अवलंबून राहिल्याने पर्यावरण आणि आर्थिक आव्हाने येतात. यावरही प्रियाने कायमस्वरूपी तोडगा काढला असून शेतात सोलर ड्रायर्स बसवले. यामुळे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी झाले, परिणामी बीनची गुणवत्ताही सुधारली. या शाश्वत पध्दतीमुळे केवळ कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण नाही तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही कमी झाला. 

जैवविविधता संवर्धनवनांमधील मानवी हस्तक्षेपामुळे आणि दिवसेंदिवस कृषी वनीकरणाच्या बदलत्या पद्धतीमुळे जैवविविधतेला बाधा पोहोचत आहे. म्हणून प्रिया यांनी  शेतातील पर्यावरणीय समतोलाचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून हे आव्हान लिलया पेलले आहे. स्थानिक वनस्पती आणि प्राणी ओळखण्यासाठी त्यांनी Artificial Intelligence वापर केला. यामुळे त्यांना जैवविविधता टिकवण्यासाठीचे दीर्घकालीन उपाय करण्यास मदत झाली. सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याने त्यांना हे सहज शक्य झाले.

सॉफ्टवेअर आणि डेटा ॲनालिटिक्सचे कौशल्य असलेली एक तरूणी येते आणि  शेतीमध्ये आधुनिक बदल करते हे खरंतर वाखाणण्याजोगं आहे. त्यांच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा फायदा तेथील स्थानिक शेतकऱ्यांनाही झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्याही शेतीत या प्रयोगानुसार आधुनिक बदल करायला सुरूवात केली आहे.

शेतकऱ्याकडील पारंपरिक शेतीच्या ज्ञानाला नव्या तंत्रज्ञानाची जोड दिली आणि सरकार, शेतकरी आणि इतर प्रतिनिधींनी एकत्र येत काम केले, तर कृषी क्षेत्रातील नवनव्या संधी डोकावू शकतील आणि विकासाचा नवा शाश्वत पर्याय आपल्यासमोर उपलब्ध होऊन शेती समृद्ध होईल असा विश्वास प्रिया यांना वाटतो.

संकलन: दिपाली शिंदे, पुणे

टॅग्स :आर्टिफिशिअल इंटेलिजन्सशेतीफलोत्पादन