Kharif Sowing : गेल्या काही वर्षात वळवाचा किंवा मान्सूनपूर्व पाऊस (Avkali Paus) नित्याप्रमाणे मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पडत नाही. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर ऋतुचक्रात बदल होऊन वर्षातील तीनही हंगाम साधारणपणे १५ दिवस ते १ महिन्याच्या कालावधीने उशिरा सुरू होत होऊ लागले आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून अलीकडे वळवाचा पाऊसही (Valvacha Paus) जून महिन्यात नियमित मान्सूनच्या काही दिवस अगोदर पडायला लागला आहे. मात्र पडणारा हा पाऊस खरीप पिकांच्या पेरणीसाठी पुरेसा पडत नसतो, हा पाऊस म्हणजे वळवाचा पाऊस (Pre Monsoon Rain) आहे असे गृहीत धरून नेहमी मे महिन्यात करण्यात येणारी शेतीचीपूर्वमशागतीची कामे शेतकऱ्यांनी या पावसानंतर त्वरित हाती घ्यावीत.
जमिनीची उन्हाळी नांगरट झाल्यानंतर शेतात मातीची घट्ट अशी ढेकळे मोठ्या प्रमाणात तयार होतात. कडक उन्हाळ्यात अशा प्रकारची ढेकळे चांगली तापून निघाल्यामुळे पडलेल्या मान्सूनपूर्व पावसानंतर किमान २ कोळपण्या किंवा वखरण्या करून जमीन भुसभुशीत करणे गरजेचे असते. अशा भुसभुशीत जमिनीत पुढे पावसाचे पडणारे पाणी चांगल्या प्रकारे मुरते.
तसेच बी उगवणीसाठी जमिनीत योग्य वातावरणही तयार होते. मान्सूनपूर्व पावसाच्या ओलीवर कुठलीही मशागत न करता घाईने शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली व पाऊस लांबला किंवा लागोपाठ मोठे पाऊस झाले तर केलेली पेरणी वाया जाते.
तसेच महागडे बियाणे व खतांचा अपव्यय होतो. त्यासाठी सुरुवातीचे मोठे पाऊस होऊन गेल्यानंतर, पूर्वमशागतीनंतर जमिनीची तहान पुरेशी भागल्यानंतरच खरीपाच्या पिकांची शेतकरी बांधवांनी पेरणी करावी.
- डॉ. कल्याण देवळाणकर, सेवा निवृत्त कृषी विद्यापीठ शास्रज्ञ