Join us

अहमदनगरची चिंच जगभरात पोहचली, कसा मिळतोय बाजारभाव? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 4:16 PM

अहमदनगरच्या बाजारातील चिंच गुणवत्तेमुळे फक्त देशभरातच नाही तर जगभरात पोहोचली आहे.

अहमदनगर : अहमदनगरच्या बाजारात जवळपास ७ जिल्ह्यांतील चिंचाची आवक झाली आहे. यंदा उत्पादनात दुपटीने वाढ झाली असून, १५ हजार रुपये क्विंटलपर्यंत चिंचांना भाव मिळत आहे. अहमदनगरच्या बाजारातील चिंच गुणवत्तेमुळे फक्त देशभरातच नाही तर जगभरात पोहोचली आहे. चिंचांमुळे हजारो महिलांना रोजगार मिळाला आहे.

अहमदनगर हे राज्यातील चिंचेच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे. मालाची गुणवत्ता व व्यवहारातील पारदर्शकता यामुळे देशभरातील चिंचेचे व्यापारी नगरच्या बाजारातील चिंच खरेदी करण्यास प्राधान्य देतात. औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, जालना, सोलापूर, नाशिक, जालना आदी जिल्ह्यांतील चिंचा विक्रीसाठी येथे येतात. सध्या बाजारात दररोजच्या हजार गोण्यांची आवक सुरु आहे. मार्च महिन्यात ही आवक थेट पाच हजार गोण्यापर्यंत होती. सध्या चिंचेला क्विंटलमागे नऊ हजार ते 15 हजार रुपये भाव मिळत आहे. 

अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चिंचेचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे बाजारपेठांमध्ये चिंचेची मोठी आवक होत आहे. त्याचबरोबर देशभरातील बाजारात येथीलच चिंचा विक्रीसाठी जात असतात. देशात सर्वात जास्त चिंचेचा व्यापार याच ठिकाणी होत असल्याचे चिंच व्यापारी सांगतात. तसेच जगभरात भारतातीलच चिंचेला मागणी होत असल्याने नगरच्या चिंचा सातासमुद्रापार पोहचत आहेत. 

चिंचोक्याचे भाव कसे आहेत? 

चिंच व्यापारी योगेश चंगेडिया म्हणाले की, येथील चिंचा देशातच नाही तर जगभरात विक्रीसाठी जातात. नगर हे चिंच व्यवसायाचे मोठे केंद्र आहे. सात जिल्ह्यांतील माल नगरला विक्रीसाठी येतो. सध्या ९ हजार ते १५ हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव आहेत. यावर्षी माल व भाव चांगला होता. तर मागील वर्षी चिंचोक्याचे भाव १५०० ते १७०० रुपये क्विंटल होते. यावर्षी त्यात दुपटीने वाढ झाली असून यंदा ३ हजार ते ३ हजार २०० रूपये क्विंटल इतका भाव चिंचोक्यांना मिळाला. यामुळे मजुरी करणाऱ्यांनाही चांगली मजुरी मिळाली.

चिंच उत्पादकांना उत्पन्न किती मिळते? 

जेउर येथील चिंच उत्पादक शेतकरी उचित पवार म्हणाले की, आमच्याकडे चिंचांची ५० झाडे आहेत. दरवर्षी घरीच चिंचा फोडून बाजारात पाठवत असतो. परंतु, सध्या चिंचा फोडण्यासाठी मजूर मिळत नाहीत. सध्या बाजारात नऊ हजार रुपये क्विंटल प्रमाणे बाजार भाव मिळत आहे. दरवर्षी चिंचांचे हमरवास उत्पादन मिळते. त्यामुळे मुलांचे शिक्षण व घर खर्चाला मोठा आधार मिळत असतो. दरवर्षी साधारणपणे पाच ते लाख पाच ते सात लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.तर मजूर लताबाई शिंदे म्हणाल्या की, फेब्रुवारी महिना सुरु झाला की चिंच खाली उतरावयाला सुरुवात होते. सध्या चिचाचे उत्पादन जास्त आहे. चिंच गोळा करण्यासाठी ३०० रुपये रोजंदारी मिळते. एक- दीड महिना चिच उतरवल्या जातात. नंतर चिंच फोडण्याचे काम चालू होते. यातून आम्हाला चांगला रोजगार मिळाला.

आजचे चिंच बाजारभाव 

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज चिंचेला सरासरी 5000 रुपयांचा दर मिळाला. श्रीरामपूर बाजार समितीत सरासरी 1700 रुपये दर मिळाला. तर शेवगाव- भोदेगाव बाजार समितीमध्ये लाल चिंचेला सरासरी 1900 रुपये दर मिळाला. 

टॅग्स :शेतीअहमदनगरमार्केट यार्डशेती क्षेत्र