- संजय तिपाले
Agriculture News : ऐन पेरणीच्या लगबगीत बियाण्यांची अन् तरारुन आलेल्या पिकाला "डोस" देण्याच्या वेळी खताची टंचाई दरवर्षीचीच. यंदा जिल्ह्याच्या सगळ्याच भागांतून शेतकऱ्यांची ओरड आहे. धानोरा, मुलचेरामध्ये तर अक्षरशः कृषी दुकानांना यात्रेचे स्वरूप आले.
अखेर पोलिस बंदोबस्त तैनात करून खताचे वितरण करण्याची नामुष्की ओढवली. 'मागणी-पुरवठ्या'चे गणित नेमके कुठे चुकतेयं, टंचाईच्या आडून साठेबाजी, विक्रीच्या नावाखाली 'लिंकिंग' अन् २६६ रुपयांची युरियाची बॅग सर्रास तीनशेपेक्षा जास्त रुपयांना विकणाऱ्या नफेखोरीचं काय करायचं, खतासाठी शेतकऱ्यांना रांगेतच उभं का राहावं लागतं, या प्रश्नाचे उत्तर कोण देणार?
१५ किलोमीटरवरहून सलग तीन दिवस तालुका मुख्यालयी गेलो. खताचा ट्रक आल्याची माहिती मिळते, पण दुकानात पोहोचण्याआधीच ते संपून जाते.... कुरखेडा तालुक्याच्या शिवणीचे शेतकरी तुकाराम मारगाये सांगत होते, शेतातलं पीक पाहून जीव कासावीस होतो. खत कुठून आणू, हा प्रश्न आहे.
धानोरातील सुखदेव टेकाम म्हणाले, माझ्याकडे सहा एकर शेती आहे, धानपीक जोमात आलंय, सध्या पाच बॅग युरियाची गरज आहे, पण एकच मिळाली, काय करू सुचत नाही. ही प्रातिनिधीक उदाहरणे, पण कोरचीपासून ते सिरोंचापर्यंत शेतकऱ्यांची याहून वेगळी स्थिती नाही. खताच्या मागणी-पुरवठ्याचे सूत्र जुळविण्यात कृषी विभागाला नेहमीप्रमाणे यंदाही सपशेल अपयश आले.
शेती कसावी की नाही, हा प्रश्नकृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे सहपालकमंत्री असलेल्या गडचिरोलीत शेतकऱ्यांची खतासाठी परवड होत असेल तर इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल याचा अंदाज येईल. मुबलक खते, बियाणे, शेतकऱ्यांची लूट होणार नाही, असे दावे जिल्हा प्रशासनाकडून केले जातात. मात्र, प्रत्यक्षात बियाणे, खतासाठीही नडविले जात असेल तर शेती कसावी की नाही, हा प्रश्न आहे.
मागणीपेक्षा खतांचा पुरवठा कमीचजिल्ह्यात खरीप हंगामासाठी युरिया खताची ३०१८५ मे.टन ची मागणी केली होती, तसेच DAP, MOP, SSP, NPK यांची अशी एकूण ७२६२० मे. टनची मागणी नोंदवली होती. पुण्याच्या कृषी आयुक्तालयाकडून युरिया २०४६७ मे. टन व इतर खते असे एकूण ५७६७२ मे.टन खताचे आवंटन मंजूर झाले. हंगामातील ६४३१ मे.टन युरियाचा मागील रब्बी साठा शिल्लक होता व सध्या एप्रिलपासून आतापर्यंत १५०८५ मे.टन युरिया प्राप्त झाला. एकूण खरीप हंगामासाठी २१५१६ मे. टन युरिया मिळाला. मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने गणित बिघडले.