Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात हापूस, केशर दाखल; अक्षय्य तृतीयेपूर्वीच आमरसावर ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 14:03 IST

रत्नागिरी सह परराज्यातून आंबे दाखल

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला अद्याप अवधी आहे. त्यापूर्वीच रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, जालनासह इतर राज्यातून हापूस, बदाम, केशर आंब्याची आवक झाली असून, बाजारात चांगलाच सुगंध दरवळत आहे.

बाजारात वेगवेगळ्या जातीचे आंबेदेखील येत आहेत. हे आंबे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. सध्या केशर, आंबा रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री केला जात आहे. त्यामुळे ग्राहकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही; परंतु नोकरदारवर्ग अक्षय्य तृतीयेपूर्वीच आंबे खरेदी करून रसावर ताव मारताना दिसत आहेत. या आंब्यांचे दर सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नसल्याने अनेकजण दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

गावरान आंब्यांचे दर

यंदा महिनाभरापूर्वी जालना परतूरसह तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने गावरान आंब्यांना आलेला मोहर पूर्णतः गळून पडला. त्यामुळे यंदा गावरान आंबा चाखायला मिळतो की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे; परंतु आताही मोठ्या प्रमाणात गावरान आंब्यांना पसंती दिली जाते. त्यामुळे यंदा गावरान आंब्याचे भाव चढे राहतील, असे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

वानरामुळे गावरान आंब्याचे नुकसान

• परतूर तालुक्यात सध्या वानरांचा उपद्रव वाढला आहे. ही वानरे फळ झाडावर चढून फळांचे मोठे नुकसान करीत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळीने मोठे नुकसान झाले.

• त्यामुळे गावरान आंब्याच्या कैऱ्या खाली पाडण्याबरोबरच अर्धवट खाऊन फेकत असल्याने आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे या वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

हेही वाचा - एकरात लाखोंची कमाई देणारी तूर भारी; ऊस, कपाशीला आता नको म्हणतोय शेतकरी

गावरान आंबा बाजारात येण्यास लागणार उशीर

आता एप्रिलच्या शेवटी विविध जातीचे आंबे बाजारात दाखल झाले आहेत. एप्रिलमध्ये हापूस आंबा आला आहे, तर मेमध्ये गुजरातचा केशर व अखेरीस मराठवाड्यातील केशर आणि गावरान आंब्याचे आगमन होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना गावरान आंब्यांचा रस खाण्यासाठी थांबावे लागणार आहे.

सध्या आंब्याला शंभरच्या वर भाव सध्या आंब्याला १०० ते १५० प्रतिकिलो भाव मिळत आहे. परतूर परिसरात आंबा मिळत नसल्याने हा आंबा बाहेरून येत आहे. त्यामुळे दर वधारलेले आहेत. - एजाज बागवान, आंबा विक्रेते

गावरान आंब्यांची प्रतीक्षा गेल्या दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी, केरळसह छत्रपती संभाजीनगरातून विविध जातीचे आंबे दाखल झाले आहेत; परंतु हे आंबे १०० ते १५० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडत नसल्याने गावरान आंब्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. -विष्णुपंत इंगळे, ग्राहक

टॅग्स :आंबाशेतीवादळबाजार