Join us

मराठवाड्याचा पाणीप्रश्न नक्की आहे तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 8:00 PM

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता होत असताना त्यानिमित्ताने दि. १६ सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्याची राजधानी असलेल्या ...

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता होत असताना त्यानिमित्ताने दि. १६ सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरात होत आहे. जल विकास व व्यवस्थापन आणि पाण्याचे समन्यायी वाटप याबाबत मराठवाड्याचा पाणीप्रश्न नक्की आहे तरी काय? याचा तपशील या लेखात दिला आहे. 

बांधकामाधीन प्रकल्प :

महाराष्ट्रातील गोदावरी नदीचा एकात्मिक राज्य जल आराखडा जून २०१७ मध्ये तयार करण्यात आला. त्या मराठवाड्यातील बांधकामाधीन प्रकल्पांचा तपशील देण्यात आला आहे. त्यानुसार मार्च २०१६ मध्ये मराठवाड्यात आठ मोठे, सहा मध्यम आणि चाळीस लघु असे एकूण ५४ राज्यस्तरीय सिंचन प्रकल्प बांधकामाधीन होते. त्यांची एकूण अद्ययावत किंमत (मार्च (२०१६ अखेर २१ हजार ७१७ कोटी रुपये, तर ते प्रकल्प पूर्ण करण्यासाठीची उर्वरित किंमत ११ हजार ८८ कोटी रुपये (एप्रिल २०१६) इतकी होती. मोठे प्रकल्प सरासरी ३७ वर्षे, तर मध्यम प्रकल्प सरासरी २६ वर्षे रखडलेले आहेत. (लघु प्रकल्पाचा तपशील येथे देण्यात आलेला नाही.)

नांदूर मधमेश्वर प्रकल्प

•  मूळ प्रकल्प अहवालानुसार मुकणे, चाकी, भाम व भावली या धरणांतील एकूण सर्व पाणी गोदावरी नदीद्वारे मधमेश्वर कालव्यावरील सिंचनासाठी चापरणे अभिप्रेत असताना नाशिक भागातील बिगर सिंचनासाठी प्रकल्पात एकूण ४२ टक्के आरक्षण करण्यात आले आहे.

•  कृष्णा खोचातील मराठवाड्याच्या 'हक्काचे २३.६६ टीएमसी पाणी त्वरित द्यावे, कृष्णा मराठवाडा सिंचन योजना ही कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेवर अवलंबून आहे.

• पण, आता कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेला कृष्णा पाणी तंटा लवादाची अनुमती नसल्यामुळे कृष्णा-मराठवाडा सिंचन योजनेबद्दल शंका निर्माण झाली आहे.

• त्यामुळे कृष्णा-मराठवाडा सिचन योजना आणि एकूणच कृष्णा खोयातील मराठवाड्याच्या हक्काचे पाणी याचा तातडीने पुनर्विचार होणे आवश्यक आहे.

जल नियोजनाची ऐशी तैशी

  • जायकवाडी प्रकल्प व त्याचे लाभक्षेत्र निम्न गोदावरी खोऱ्यात तर पाणलोट क्षेत्र मात्र उर्ध्व गोदावरी खोऱ्यात आहे.
  • जायकवाडीच्या मूळ नियोजनातील गृहिते (सर्व आकडे टीएमसीमध्ये) पुढीलप्रमाणे आहेत.
  • ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात जायकवाडीपर्यंत पाण्याची उपलब्धता १९६ टीएमसी आहे. यापैकी नाशिक आणि नगर जिल्हह्यांतील धरणांकरिता ११५ टीएमसी पाणी आहे. .
  • ७५ टक्के विश्वासार्हतेचा जायकवाडीचा येवा ९४.४ संकल्पित उपयुक्त साठा - ७७. निभावणीचा साठा १३. जायकवाडीतून माजलगाव प्रकल्पासाठी सोडायचे पाणी प्रवाही सिंचनासाठी पाणी - ४९ .

पण कटू वास्तव वेगळे आहे. ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात जायकवाडीपर्यंत पाण्याची उपलब्धता 196 नव्हे तर 156 एवढीच आहे असे आता शासन म्हणते. नाशिक आणि नगर भागात मूळनियोजनापेक्षा जास्त क्षमतेची धरणे बांधली गेली त्या धरणांची प्रत्यक्ष साठवण क्षमता 150 टीएमसी म्हणजेच 35 टीएमसी अधिक आहे.पण पाण्याचा प्रत्यक्ष वापर त्यापेक्षा खूप जास्त होतो. कारण खरिपात धरणातील पाणी कालव्याद्वारे सर्वत्र बेकायदा फिरवले जाते त्यामुळे धरणातील पाणी पातळी कमी होते. त्या भागात पाऊसमान चांगलं असल्यामुळे धरणे परत भरतात. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे सर्वसामान्य पर्जन्यमानाच्या वर्षात देखील आता जायकवाडीत प्रत्यक्ष आवक 28.22 टीएमसी म्हणजेच 30 टक्के एवढी येईल. तात्पर्य हा प्रकार असाच चालू राहिला तर जायकवाडी यापुढे कधीही पूर्ण भरणार नाही. अधिकारी म्हणतात विज्ञान आणि तंत्रज्ञानात बदल झाला पण हे फक्त जायकवाडी बाबतीत कसे घडले? जायकवाडीच्या समकालीन आणि इतर प्रकल्पात का नाही झाले तसे? उत्तर नाही! ठीक आहे. 40 टीएमसी तूट आहे हेही मान्य. पण सगळी तूट फक्त जायकवाडी वरच टाकत जायकवाडी आणि तिच्या वरच्या सर्व प्रकल्पांमध्ये तुटीच्या समन्वय वाटप का नाही करत?

प्रदीप पुरंदरे (लेखक हे मराठवाडा पाणी प्रश्नाचे अभ्यासक आहेत).

 

टॅग्स :धरणमराठवाडा वॉटर ग्रीडजायकवाडी धरण