- प्रवीण खिरटकर
चंद्रपूर : पारंपरिक पिकांमधून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने शेतीत बदल करण्याचा निर्णय घेतलेल्या वरोरा तालुक्यातील पोहा येथील शेतकरी सुरेश शंकर पोतराजे यांनी टरबूज लागवडीद्वारे यशाची नवी कहाणी लिहिली आहे. त्यांच्या शेतातील दर्जेदार टरबूज थेट दिल्ली बाजारात पोहोचला आहे. तालुक्यातील शेतमाल प्रथमच इतक्या लांब बाजारपेठेत गेल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
मागील अनेक वर्षापासून पोतराजे हे सोयाबीन, कापूस, तूर, चणा अशी पारंपरिक पिके घेत होते. मात्र, त्यातून अपेक्षित आर्थिक लाभ मिळत नव्हता. शेतात उपलब्ध असलेली सिंचन व ठिबक व्यवस्था लक्षात घेऊन त्यांनी मागील वर्षी दोन एकरात टरबुजाची लागवड करण्याचा प्रयोग केला. या प्रयोगातून खर्च वजा जाता सुमारे दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला.
यावर्षी त्यांनी डिसेंबर महिन्यात टरबूज पिकाची लागवड कढवत पाच एकर क्षेत्रावर टरबूज व खरबूज घेतले. लागवडीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथून 'सिंबा' जातीची रोपे आणण्यात आली. टप्प्याटप्प्याने लागवड करत त्यांनी उत्पादन वाढवले, टरबुजाचा दर्जा उत्कृष्ट असल्याने व्यापाऱ्यांनी शेतातच खरेदी केली व माल दिल्लीला रवाना केला.
हा माल पुढे अरब राष्ट्रांमध्ये जाण्याची शक्यता होती. मात्र, सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीमुळे निर्यात थांबल्याने शेतकऱ्यांना प्रतिकिलो पाच रुपये दराने कमी दर स्वीकारावा लागला. टरबूज गोड असल्याने रस शोषण करणारे किडे व मधमाश्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. यासाठी पोतराजे यांनी शेतात सापळे लावून किड नियंत्रण केले, त्यामुळे टरबुजाचा दर्जा व गोडवा कायम राखण्यात यश आले.
शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांबरोबरच नाविन्यपूर्ण शेतीकडे वळावे. आर्थिक प्रगतीसाठी फळपिके हा चांगला पर्याय ठरू शकतो. भविष्यात नर्सरी सुरू करून इतर शेतकऱ्यांनाही रोपे उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.- सुरेश पोतराजे, टरबूज उत्पादक शेतकरी
ज्या पिकातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल, त्या पिकांकडे वळणे गरजेचे आहे. कृषी विभागाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.- विजय काळे, मंडळ कृषी अधिकारी
Web Summary : सुरेश पोतराजे, a farmer from Warora, adopted watermelon farming after traditional crops failed. His high-quality watermelons reached Delhi, yielding significant profits from two acres, boosting his confidence and inspiring others to explore innovative farming.
Web Summary : वरोरा के किसान सुरेश पोतराजे ने पारंपरिक फसलों से निराशा के बाद तरबूज की खेती अपनाई। उनके उच्च गुणवत्ता वाले तरबूज दिल्ली पहुंचे, जिससे अच्छी कमाई हुई और किसानों को नई राह मिली।